⚡सावंतवाडी,ता.१३-: निरवडे येथील पियुष बर्डे या युवकाने भारतीय सैन्य दलात ‘अग्निवीर’ म्हणून स्थान पटकावले आहे त्याच्या या यशाने केवळ निरवडे गावाचेच नव्हे, तर संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
पियुषचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याने एका प्रशिक्षण अकॅडमीतून भरती प्रक्रियेचे प्राथमिक धडे गिरवले होते. मात्र, अकॅडमीतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा काळ त्याच्यासाठी खऱ्या परीक्षेचा होता. केवळ प्रशिक्षणावर अवलंबून न राहता त्याने स्वतःला सरावात पूर्णपणे झोकून दिले. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत मैदानावर घाम गाळण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत अभ्यासात चिकाटी ठेवण्यापर्यंतचा त्याचा दिनक्रम थक्क करणारा होता. स्वतःच्या जिद्दीवर आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने भरती प्रक्रियेतील सर्व कठीण टप्पे यशस्वीपणे पार केले.
पियुषचे वडील एक शेतकरी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. उलट, कुटुंबाची परिस्थिती बदलण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने ही मेहनत घेतली. अत्यंत पारदर्शक आणि चढाओढीच्या असलेल्या या प्रक्रियेत पियुषने आपल्या कौशल्याच्या जोरावर यश खेचून आणले असून आज त्याचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे.
एका सामान्य मुलाने स्वबळावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर तरुणांसाठी मोठे प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थितीचे भांडवल न करता जिद्द आणि सातत्य ठेवल्यास आभाळाला गवसणी घालता येते, हेच पियुषने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सध्या संपूर्ण निरवडे गावात आनंदाचे वातावरण असून, सर्वच स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
