Headlines

ओरोस येथे एनसीसी प्रशिक्षण शिबीर संपन्न

मालवण (प्रतिनिधी)

५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथे आयोजित दहा दिवसीय संयुक्त राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) प्रशिक्षण शिबिराचा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या शिबिरात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३७० एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेत विविध लष्करी आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

या शिबिरात कंम्बाईन्ड अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प, रिपब्लीक डे कॅम्प आणि थल सैनिक कॅम्प या तीन महत्त्वाच्या प्रशिक्षणांचे एकत्रित आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कॅडेट्सना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे प्रगत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. दहा दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग, नकाशा वाचन, फिल्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास, योग, शारीरिक तंदुरुस्ती, साहसी उपक्रम आणि राष्ट्रभक्तीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिस्त, संघभावना देशसेवेची प्रेरणा देणारे शिबीर कॅडेट्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरले.

शिबिराचे नेतृत्व कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज यांनी सक्षम, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने केले. त्यांना ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर कुलदीपकर सुधाकर, आर्मीचे जवान प्रदीप पाटील आर्मीचे इतर प्रशिक्षित जवान तसेच बटालियनमधील सर्व ऑफिस स्टॉप व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी विविध महाविद्यालयांतील असोसिएट एनसीसी ऑफिसर्सना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. लेफ्टनंट प्रा. डी मल्लेश खोत (सिंधुदुर्ग कॉलेज मालवण ), Ano गुरव सर कणकवली, Ano पावरी मॅडम आणि Ano गावित मॅडम यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या विभागांचे उत्कृष्ट नियोजन करून शिबिराच्या यशात मोलाची भूमिका बजावली.

समारोप कार्यक्रमात शिबिरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सचा गौरव करण्यात आला. शिबिरादरम्यान कॅडेट्सनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य सादर केले. राष्ट्रीय एकात्मता, शिस्त आणि देशसेवेची भावना रुजविणारे हे शिबीर यशस्वीपणे पार पडल्याने सहभागी कॅडेट्स आणि अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

आगामी काळात अशा शिबिरांसाठी अधिक सक्षम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या शिबिरादरम्यान काही मूलभूत सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवली. प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था, शौचालये, पिण्याचे पाणी आणि कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची गरज अधोरेखित झाली. सिंधुदुर्गसारख्या सीमावर्ती आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात एनसीसीच्या प्रशिक्षणासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी लेफ्टनंट प्रा. मल्लेश खोत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page