Headlines

दशावतार कलाकारांना समाजाने आणि शासनाने अधिक बळ देण्याची गरज…

दत्ता सामंत:मालवणात संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡मालवण ता.१३-:
दशावतार ही कोकणची अमूल्य सांस्कृतिक परंपरा असून दशावतार म्हणजे कोकणच्या संस्कृतीचा आत्मा आहे. या कलेचा वारसा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. अनेक कलाकार प्रतिकूल परिस्थितीत ही कला जिवंत ठेवत आहेत. अशा कलाकारांना समाजाने आणि शासनाने अधिक बळ देण्याची गरज आहे, कलाकारांचा सन्मान, त्यांच्या संघर्षाची दखल आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे, हीच या कलेप्रती खरी कृतज्ञता ठरेल, असे प्रतिपादन उद्योजक दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले.

दशावतार कला आणि कलाकारप्रेमी मालवण, मालवणी जत्रा आणि संयुक्त दशावतार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिव अजमिढ संग्राम’ अर्थात ‘अजमिढ शरसेतू’ या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाला रविवारी मालवण येथील दैवज्ञ भवन हॉल येथे नाट्यरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक दशावतारातील प्रभावी अभिनय, दमदार संवादफेक, नेत्रदीपक रंगभूषा आणि संगीताच्या सुरेल साथीत रंगलेल्या या प्रयोगाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

कार्यक्रमात दशावतारी लोककलावंतांच्या समस्या सातत्याने समाजासमोर मांडणारे निर्भीड पत्रकार मनोज चव्हाण, नाट्य अभिनेत्री शुभदा सचिन टिकम, तबला विशारद सुधीर मच्छींद्रनाथ गोसावी आणि संगीत अलंकार दिलीप प्रभाकर ठाकुर यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपिठावर उद्योजक दत्ता सामंत, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, उद्योजक संजय गावडे, अॅड. दिलीप ठाकुर, अॅड. समृद्धी आसोलकर, कलाप्रेमी प्रदीप वेंगुर्लेकर, बुवा भालचंद्र केळुसकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक कोळंबकर, बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळाचे मालक मामा माळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्योजक दत्ता सामंत म्हणाले, दशावतार कलेला योग्य आर्थिक बळ मिळण्यासाठी भविष्यात तिकीट लावूनही दशावतार सादर करणे आवश्यक आहे. राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी आणि सांस्कृतिकमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच भव्य संयुक्त दशावतार आयोजित करण्याचा मानस दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

दशावतार कला आणि कलाकारप्रेमी, मालवणचे प्रमुख आयोजक सुहास (मामा) माळकर यांचा उल्लेख करताना अध्यक्ष विनायक कोळंबकर यांनी, मामा माळकर ही व्यक्ती नसून दशावतारासाठी अखंड झटणारी चळवळ आहे, असे गौरवोद्वार काढले. सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर, प्रास्ताविक रुपेश नेवगी, आभार बलवंत सामंत यांनी मानले. सत्काराला अॅड. ठाकुर, शुभदा टिकम यांनी उत्तर दिले.

यावेळी सादर झालेल्या नाट्यप्रयोगात दत्तप्रसाद शेणई, सुहास (मामा) माळकर, बाबा मयेकर, मोरेश्वर सावंत, नीलकंठ सावंत, सागर गावकर, महेंद्र कुडव, उदय मोर्ये, चारुहास मांजरेकर, प्रशांत मयेकर, सुयश ठाकुर, शिवा मेस्त्री आणि प्रथमेश सामंत यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. हार्मोनियमवर गुणाजी घाडीगावकर, मृदंगमणी किसन नेमळेकर आणि तालरक्षक हरेश नेमळेकर यांनी उत्कृष्ट संगीत साथ देत नाट्यप्रयोगाची रंगत अधिक खुलवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ, कोळंब यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page