⚡मालवण ता.२४-:
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणतर्फे कोमसापचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘करूळचा मुलगा’ या आत्मचरित्रावर आधारित आयोजित पुस्तक परिचय लेख स्पर्धेत रसिका राजेंद्र तेंडोलकर (कसाल ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धा कोमसाप मालवणच्या सक्रिय कार्यकर्त्या सुजाता सुनील टिकले (कणकवली) यांनी आपल्या दिवंगत मातोश्री कै. विजया भास्कर वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुरेश गावकर ज्येष्ठ कोमसाप कार्यकर्ते आचरा मालवण यांच्या अध्यक्षतेखाली बिडये विद्यामंदिर केंद्र शाळा आचरे नं.१ येथे संपन्न झाला. सदर स्पर्धेचे परीक्षण सुधाकर वळंजू (पणदूर) यांनी केले होते. या स्पर्धेत परीक्षकांच्या द्वितीय- वंदना नारायण राणे ( कणकवली), तृतीय -रश्मी रामचंद्र आंगणे (ओसरगाव), उत्तेजनार्थ- श्रद्धा वाळके(मसुरे), महादेव बागडे (आचरा)मोहन गावकर (कोल्हापूर), मधुरा माणगावकर (कणकवली), उज्ज्वला धानजी (कणकवली),चंद्रशेखर धानजी (कणकवली), शरयू घाडी (मुणगे- देवगड) यांनी यश मिळविले.
विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून आलेला व त्यांची स्वाक्षरी असलेला त्यांचाच ‘स्मृतिजागर’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. तसेच सहभागी स्पर्धकांनाही सुजाता टिकले यांनी अरण्यॠषी मारुती चितमपल्ली यांचा ‘रानवाटा’ हा ग्रंथ प्रदान केला. यावेळी व्यासपीठावर सुरेश ठाकूर, सुधाकर वळंजू, अशोक कांबळी, सदानंद कांबळी, स्नेहा नारिंगणेकर, कुमार कांबळे, माधव गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरेश ठाकूर, सुरेश गावकर, विजेत्या रसिका तेंडोलकर यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, कवयित्री सुनंदा कांबळे, द.शि. हिर्लेकर गुरुजी, बाबाजी भिसळे,प्रकाश पेडणेकर, मंदार सांबारी आदी व इतर साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कोमसाप मालवणच्या कार्यकारी मंडळाने केले होते.
