Headlines

दिशाहीन झालेल्या समाजाला ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता…

वामन परब :मालवणात सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा..

⚡मालवण ता.०२-:
संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे वामन परब यांनी येथे केले.

सनातन संस्थेच्या वतीने मालवण येथील दैवज्ञ भवन येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी परब हे बोलत होते. या महोत्सवाची सुरुवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमात सनातन संस्था आणि संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्यावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. तसेच डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन, धर्मरक्षक व हिंदुनिष्ठांचा सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठी संकल्प आणि नामजप करण्यात आला.

आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता, हिंदूंनी प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. देशातील पोलीस दलाची मर्यादित संख्या पाहता प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचे दायित्व पोलीस यंत्रणा एकटी पार पाडू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता प्रत्येक हिंदूने स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे, असा सूर यावेळी उमटला.

साधनामय जीवनात ‘मीपणा’ म्हणजेच अहं-निर्मूलन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीगुरू आणि भगवंत यांच्या चरणी जे आपले सत्त्व अर्पण करतात, तेच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात, असा संदेशही या प्रसंगी देण्यात आला.

यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, मल्याळम् आदी भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, देवगड, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे हा महोत्सव पार पडला. याशिवाय, ऑनलाईन प्रसारित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सचा देश-विदेशांतील हजारो भाविकांनी लाभ घेतला.

गुरुपूजन पंकज नेरकर (कोळंब) यांनी केले. पौरोहित्य सतीश वझे यांनी केले. सूत्रसंचालन तन्वी परब यांनी केले. मुख्य वक्ते वामन परब यांचे स्वागत अॅड. हेमेंद्र गोवेकर यांनी केले. भाजपचे नगरसेवक मंदार केणी व शिवसेना नगरसेवक तपस्वी मयेकर यांचे स्वागत दीनानाथ गावडे यांनी केले. भाजप नगरसेविका महानंदा खानोलकर यांचे स्वागत अमृता फाटक यांनी केले. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेविका पूजा करलकर यांनी विशेष भेट दिली. यावेळी अॅड. गिरीश गिरकर, समीर गवाणकर, ऐश्वर्य मांजरेकर, डॉ. अविनाश झांटये, शिल्पा झांटये यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page