⚡मालवण ता.२७-:
मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक नऊ ब मधून जोरदार प्रचार यंत्रणा राबविणाऱ्या भाजपच्या उमेदवार अन्वेशा अजित आचरेकर यांनी आपल्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे गेल्या दहा वर्षांत या प्रभागात केलेल्या प्रभावी कामांचा, दिलेल्या योगदानाची दखल मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास मालवण प्रभाग क्रमांक नऊ ब च्या उमेदवार सौ अन्वेशा आचरेकर यांनी व्यक्त केला.
मालवण प्रभाग नऊ मध्ये दांडीचा भाग येतो. या प्रभागात भाजपकडून अन्वेशा आचरेकर या निवडणूक लढवीत आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला. यात भाजपच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत प्रभागाच्या विकासासाठी जी भरीव कामे केली ती त्यांनी प्रभावीपणे जनतेसमोर प्रचाराच्या दरम्यान मांडली. त्याशिवाय येत्या काळात दांडी किनारी बंधारा कम रस्ता, स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी खाऊ गल्ली सारखी योजना सुरू करण्याची संकल्पना पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडली आहे. ती सत्यात उतरविण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगून सौ. आचरेकर यांनी या भागात पर्यटन व मासेमारी हे दोन प्रमुख व्यवसाय चालतात. या दोन्ही व्यवसायातील लोंकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या माहीत असल्याने ते प्रश्न सोडविण्यासाठी येत्या काळात आपले प्रयत्न राहणार आहेत. हे सर्व साध्य करण्यासाठी प्रभागातील जनतेचा जो पाठींबा आहे तो आपल्यासोबत असल्याने या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे असा विश्वासही सौ. आचरेकर यांनी व्यक्त केला आहे.
यां प्रभागात अद्याप ज्या पायवाटा आहेत त्याचे रस्त्यात रूपांतर झालेले नाहीत. अंतर्गत रस्ते झालेले नाहीत, हे रस्ते होणे गरजेचे आहे. या रस्त्यांसाठी नागरिकांनी सहकार्य केले तर आपण या भागात रस्ते होण्यासाठी प्रयत्न करू. हा भाग किनाऱ्यावर किनारपट्टीचा असल्याने कल्पवृक्षाची अर्थात माडाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत, काही वेळा नारळाच्या झाडांची झावळे वीज वाहिन्यांवर पडून अनेक दिवस वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात आणि म्हणूनच भूमिगत वीज वाहिनी होणे गरजेचे आहे आणि इतर मूलभूत प्रश्न आहेत या सोडविण्याच्या दृष्टीने मी निवडणूक रिंगणात उतरले आहे असेही सौ. आचरेकर म्हणाल्या.
गेली दहा वर्ष राजकारण न करता समाजकार्यात पुढाकार घेऊन मी या भागात काम करीत आहे. अर्थातच या भागातील लोकांचे प्रश्न मला ज्ञात आहेत आणि म्हणूनच आज या भागात प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी फिरताना मला प्रतिसाद मिळत आहे. इथल्या लोकांच्या न्यायासाठी आपण निश्चितपणे कार्यरत राहू, अशी ग्वाही यावेळी सौ. आचरेकर यांनी दिली.
