निद्रिस्थ वनखात्याला जाग आणण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार:जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांची माहिती..
⚡सावंतवाडी ता.१५-: आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुसंख्य जनतेचे उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गवे-रेडे, हत्ती, माकडे रानडुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दिवस रात्र मेहनत करून पिके लावतात, खत-पाणी घालतात, कसून निगा राखतात. मात्र या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेकदा संपूर्ण पिके उध्वस्त होताना दिसून येत आहेत. त्यामुळे शेती आणि बागायती व्यवसाय पूर्णतः धोक्यात आला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून शेतकऱऱ्यांची शेती आणि शेतकरी सावरावा यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती रस्त्यावर उतरली आहे.
मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी बस स्थानकासमोर समितीच्या माध्यमातून सह्यांची मोहीम सुरू करून या प्रश्नावर जनप्रबोधन केले जाईल. झोपलेल्या वनविभागाला जाग आणण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्र लोकाधिकार समिती काम करेल, अशी माहिती महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षnदीपक कुडाळकर यांनी दिली आहे.
या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे राज्य अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर हे सावंतवाडीत उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, गवे-रेडे, हत्ती हाता-तोंडाशी आलेली पिके तुडवून नासधूस करतात. माकडांची टोळकी फळझाडांवरील फळे, परत गाडी लावलेल्या भाज्या नष्ट करतात. हत्ती, गवे-रेडे यांच्या हल्ल्यात तर शेतकऱ्यांची घरेदारेही सुरक्षित राहू शकत नाहीत. जुन्नरसारख्या ठिकाणी तर बिबटे नरभक्षक झाल्याने नवे संकट उभे राहिले आहे. शेतकरी, त्यांच्या घरातील महिला आणि विशेषतः लहान मुले यांच्या जीविताचीच तेथे सुरक्षितता उरली नसून इतर ठिकाणीही तसे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आक्रमक झालेल्या बिबट्यांपासून जीव वाचवण्यासाठी शेतात राखण करणाऱ्या कुत्र्यापासून माणसांपर्यंत गळ्यात लोखंडी खिळे असलेले पट्टे घालून वावरण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. या वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्याची तहानभूक आणि झोपही हरपून गेली आहे. त्यातून त्याचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य ही धोक्यात आले आहे. वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्याला वाचवणे आणि त्याला जगवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातील किचकट तरतुदीमुळे शेतकऱ्यांना काहीच उपाय करता येत नाहीत. त्यांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. शेतकरी वाचला तरच देश वाचेल म्हणून जंगली जनावरांच्या त्रासावर तातडीने ठोस उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी सरकारने तातडीने नुकसानभरपाईची प्रक्रिया सुलभा करावी. सोलर फेंसिंग, जाळी व इतर संरक्षणात्मक साधनांसाठी तरतूद करावी अथवा त्यासाठी अनुदान द्यावे, तसेच वनखात्याच्या पथककांना तातडीने घटनास्थळी पाठवण्याची यंत्रणा उभी करावी. स्थानिक ग्रामपंचायती, वनविभाग आणि नागरिकांची समिती नेमून शेतकरी आणि वन्यप्राणी यांच्यातील संतुलन राखण्यासाठी उपाययोजना करावी. त्यातून मजबुत सौर/विद्युत कुंपण व्यवस्था, वन्य प्राण्यांच्या हालचालीचे वैज्ञानिक मॅपिंग, जलस्त्रोत व अन्नाचे क्षेत्र नियोजन आदी उपाय तातडीने व प्रभावीपणे राबवले जाणे आजची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या वेदनेला आवाज देत शाश्वत उपायांच्या दिशेने वाटचाल व्हावी यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकदीने उभे राहणार आहे. शेतकऱ्यांना जगवण्या जे जे काही करावे लागेल ते करणार. जनता आणि शेतकऱ्यांच्या साथीने या संकटावर मात करूया आणि आज अन्नदात्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुढे येऊया असे आवाहनही कुडाळकर यांनी केले आहे.
