सेवा पंधरवड्यात सिंधुदुर्ग भाजपचे अव्वल काम…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:सहकार्य करणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांचे मानले आभार..

ओरोस ता ६
राष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत राबविलेल्या पक्षस्तरीय सेवा पंधरवडा अभियानात राज्यात अव्वल काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे झाले आहे. पक्षाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सर्व कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
येथील जिल्हा परिषद मधील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री सावंत बोलत होते. यावेळी अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्न देसाई, राज्य प्रतिनिधी संध्या तेरसे आदी उपस्थित होते. यावेळी श्री सावंत यांनी जिल्ह्यात भाजपची १४ मंडले आहेत. या सर्व मंडळांवर हे उपक्रम पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या सहभागाने पार पडले, असे सांगत यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. तसेच या कार्यक्रमाच्या नोंदीसाठी पक्षाने सरल ऍप दिला होता. त्यामुळे त्यात ठिकाण, वेळ, उपस्थिती याची ऑनलाईन नोंद करावी लागते. त्यामुळे केवळ कागदपत्रांवर हे कार्यक्रम झालेले नसून प्रत्येक्षात झाले असल्याची माहिती श्री सावंत यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, पक्षाने सेवा पंधरवडा अंतर्गत ठरवून दिल्या नुसार जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात १२२ स्वच्छ्ता कार्यक्रम घेण्यात आले. यात ४३७६ नागरिकांनी सहभाग घेतला. एक पेड मॉ के नाम या उपक्रमाचे ५० कार्यक्रम घेण्यात आले. ९२३ वृक्ष आपल्या आईच्या नावाने लावण्यात आले. आठ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यातून ६४५ जणांनी रक्तदान केले. जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गाची प्रभुद्ध नागरी संमेलने कणकवली येथे घेण्यात आले. त्यात ५० नागरिकांनी सहभाग घेतला होता.
शासनाच्या मदतीने जिल्ह्यात ३१ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. यात ४ हजार ७३ जणांनी लाभ घेतला. कसाल आणि जानवली येथे दिव्यांग मेळावा आणि साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा २१० जणांनी लाभ घेतला. व्होकल फॉर लोकल अंतर्गत कुडाळ, वेंगुर्ले शहर आणि वजराठ अशा तीन ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. एकूण २०५ जणांनी आपण उत्पादित केलेला मालं या प्रदर्शनात ठेवला होता. विकसित भारत अंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत १४५० जणांनी भाग घेतला. सावंतवाडी मोती तलाव येथे मोदी विकास मॅरेथॉन घेण्यात आली. त्यात ४५० पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदविला. कुडाळ आणि कणकवली येथे आयोजित रांगोळी स्पर्धेत २५० जण सहभागी झाले होते. २५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त ९२१ बुथवर ६५५ कार्यक्रम घेण्यात आले. या आयोजित कार्यक्रमात ६४४२ लोकांनी सहभाग नोंदविला. नमो नेत्र संजीवनी अंतर्गत कुडाळ येथे एक आणि वेंगुर्ले तालुक्यात आठ असे नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली. याचा १३४४ जणांनी लाभ घेतला. बांदा, वेंगुर्ले आणि पडेल अशा तीन ठिकाणी आयोजित महिला मेळाव्यात ८१० महिलांनी उपस्थिती दर्शविली. तर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ३६२० जणांनी सहभाग घेतला. यासाठी जिल्ह्यात ४०८ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, असे सांगितले.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: पत्रकार परिषदेत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सोबत जिल्हा संयोजक प्रसन्न देसाई, राज्य प्रतिनिधी संध्या तेरसे

You cannot copy content of this page