⚡बांदा ता.३०-: राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे व ठाकरे शिवसेनेने आनंद व्यक्त केला आहे. आज बांदा येथे उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात फटाके वाजवून व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
राज्य शासनाने सुरुवातीला हिंदी ही सक्तीची भाषा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यात बदल करत राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. राज्यात त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे विरोध केला होता. यासंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीराम चौकात यावेळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, रितेश नाटेकर, नागेश बांदेकर, राजदीप पावसकर, साईनाथ करमळकर, विशु पावसकर, अनिल नाटेकर, सुनील नाटेकर, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, प्रमोद कळंगुटकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत पांगम, विजय बांदेकर आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.