कुडाळमधील गणेश घाट रस्त्याच्या निकृष्ट कामाला जबाबदार कोण…?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:आमदार निलेश राणे निकृष्ट कामांची जबाबदारी घेणार का..?

⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ व मालवण तालुक्यात वारंवार होणाऱ्या निकृष्ट विकास कामांना सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची साथ असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे. कुडाळ शहरातील गणेश घाट रस्ता निकृष्ट झाला असून या कामाला जबाबदार कोण ? स्वतःच्या कार्यकर्त्यांकरवी झालेल्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे शासनाचा वाया जाणारा निधी व जनतेला होणारा त्रास याची पुनरावृत्ती न होण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे घेणार का? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपस्थित केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे, कुडाळ शहरातील मुख्य गणेश घाट भंगसाळ नदीकडे जाणारा रस्ता होऊन जेमतेम दिड दोन महिने झाले आहेत. हा रस्ता महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड मार्फत तब्बल 80 ते 90 लाख रूपये खर्चून बांधण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा बंदीस्त गटाराचे देखील बांधकाम रस्त्यासोबतच नव्याने करण्यात आले होते. पण संबंधित काम हे पहिल्याच पावसात पूर्णपणे वाहून गेल्याचे दिसून येत आहे. या अत्यंत निकृष्ट कामा संदर्भात संबंधित विभागास विचारले असता वापरलेले सिमेंट खराब दर्जाचे असल्याचे अजब उत्तर अधिकारी स्वतःची कातडी वाचविण्यासाठी देत आहेत.
हे काम करणारा पोट ठेकेदार हा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे अधिकारीही कारवाई करण्यास चालढकल करत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे मालवण तालुक्यात देखील आपले जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी जे काही वेळा एखादा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी स्वखर्चाने रस्ता करून देतात. त्यांनी मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अनेक कामे गेली दोन ते तीन वर्षे रखडवून ठेवल्याने, तेथील स्थानिक ग्रामस्थांना खड्डे पडलेल्या रस्त्यातून त्रास काढावा लागत आहे. यापैकी चौके-नांदरुख-आंबडोस, चौके-आंबेरी यातील एक देवली-वाघवणे-चौके रस्त्यावर मनसे मार्फत आंदोलन करत स्वखर्चाने डागडुजी केली होती. अशाच प्रकारे अजून बरीच रखडलेली कामे आहेत.
अशाप्रकारे सातत्याने होणाऱ्या निकृष्ट विकास कामांबाबत आमदार निलेश राणे यांनी प्रसंगी आपले कार्यकर्ते पदाधिकारी असले तरी कठोर भूमिका घेऊन जनतेला होणारा त्रास दूर करण्यासाठी कुडाळ भंगसाळ नदी गणेश घाटकडे जाणारा रस्ता पूर्ववत करून घ्यावा. तसेच मालवण तालुक्यातील रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page