निवडणुकीत 70 टक्के जागांवर दावा:शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यातील सूर..
⚡कुडाळ ता.२८-: कोकणात शिंदेंची शिवसेनाच एक नंबरला असल्याचा सूर आजच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेच्या दोन मंत्री आणि दोन आमदारांकडून ऐकायला मिळाला. मंत्री उदय सामंत यांनी तर दोन आमदारांसह जिल्ह्यात शिवसेना एक नंबर असल्याने आगामी निवडणुकीत 70 टक्के जागांवर आपला दावा आहे. त्यामुळे महायुतीत कमीतकमी तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागा, पक्षाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदार महोदयांनी कार्यकर्त्याना आश्वासित देखील केले.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा शनिवारी सायंकाळी पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात झाला. यावेळी मंत्री ना.उदय सामंत, मंत्री ना.भरत गोगावले, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू परब, संजय पडते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते व नीता कविटकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ मंडल तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस मंडल तालुकाप्रमुख दीपक नारकर, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले, या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद फार मोठी आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून आमदारांची संख्या लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 70 टक्के पासून मागणी सुरू झाली पाहीजे. 70 टक्के पेक्षा जास्त जागा महायुतीत मागू तेव्हा प्रत्येक गावात आपली शिवसेना 100 टक्के झाली पाहीजे. त्यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागा. तिकिट वाटपाचे सर्व निर्णय शिंदे स्वतः घेतील. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच ते योग्य निर्णय घेतील. आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे वातावरण निर्माण झाले आहे. केसरकर यांच्या अनुभवाचा फायदा घेत तशा पद्धतीने वाटचाल केल्यास निलेशजी जिल्ह्यातील निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्याची तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेची ताकद वाढत आहे. पक्षाची प्रतिमा जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्ही मंत्री म्हणून तुमच्या सोबत कायम आहोत. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तुमच्या सोबत कायम आहेत. विरोधकांच्या टिकेकडे पाहू नका. त्याकडे दुर्लक्ष करून आगामी सर्व निवडणुका जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून तसा संकल्प ठेवा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वानी जोमाने कामाला लागा. आजची गर्दी पाहता जिल्ह्यात शिवसेनाच एक नंबरचा पक्ष आहे आणि तो यापुढेही कायम राहील.
मंत्री भरत गोगावले म्हणाले, आज कोकणात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना एक नंबरला आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या तुम्हा कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. विधानसभा निवडणूकीत आम्हा आमदारांना निवडून देण्यासाठी तुम्हा कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले मेहनत घेतली. याची परतफेड करायची या निवडणूका आहेत. या निवडणुकीत आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत. जसे आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलात तसे तुम्हालाही निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. आता गाफिल राहू नका. निवडणूका जिंकण्यासाठी कामाला सुरुवात करा. तुम्हाला लागेल ती ताकद, लागेल ते सहकार्य शिंदेंचे शिलेदार म्हणून आम्ही सर्वजण करू. माझ्याकडे जे खाते आहे त्या खात्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडसह कोकणाला निश्चितच झूकते माप दिले जाईल असे गोगावले यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या जिंकण्यासाठी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीच आहे. जिल्ह्यात युती धर्म पाळलाच जाईल. युती बळकट राहिलीच पाहीजे पण त्यासोबतच आपली शिवसेनेची संघटनाही गावागावात बळकट झाली पाहीजे. महायुतीच्या माध्यमातून महायुतीची ताकद मजबुत राहीली पाहीजे अशी खा.नारायण राणे यांचीही इच्छा आहे.
आमदार निलेश राणे म्हणाले, आज जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे. अनेक प्रवेश होत आहेत. शिंदे यांच्या प्रेमापोटी हे होत आहे. अनेक जण वेटींग वर आहेत. विरोधक आता राहिलेच नाहीत. आमची स्पर्धा कोणाशी नाही. आमची स्पर्धा विकास कामांसोबत आहे. आगामी निवडणुकांत शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा जो आनंद एकनाथ शिंदे यांना होईल तो आनंद आपल्याला बघायचा आहे. कोण हरेल माहीत नाही पण जिंकलेली शिवसेनाच असेल. त्यामुळे सर्वानी कामाला सुरुवात करूया असे आवाहन त्यांनी केले. आगामी निवडणुकांत या जिल्ह्याची जबाबदारी मंत्री सामंत आणि गोगावले या दोन मंत्र्यांवर शिंदे यांनी दिल्याचे ते म्हणाले.
सायंकाळी उशिरा पर्यंत चाललेल्या या मेळाव्याला जिल्हाभरातून शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.