माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप..
⚡कणकवली ता.२७-: मावळच्या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांची तपासणी केली असता ८६० पैकी तब्बल ४५८ साकव नादुरुस्त असल्याचे आढळले आहे. साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, अशी मागणी आम्ही केलेली असतानाही नारायण राणे मात्र ग्रामविकास मंत्र्यांशी निधीसाठी पत्रव्यवहार करत आहेत. नादुरुस्त साकवांमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून या प्रकाराला राणे जबाबदार असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, साकवांची दुरुस्ती करण्याकरीता जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, अशी मागणी आम्ही केली होती. जिल्ह्यात बरेच साकव अनेक वर्षांपासून चालण्यायोग्यही नाहीत. साहजिकच या साकवांची गेल्या आर्थिक वर्षात दुरुस्ती होण्याची गरज होती. मात्र, मावळ दुर्घटनेनंतर राज्य शासनाला जाग आली तशीच येथील पालकमंत्री, खासदार, आमदार यांना आता जाग आली आहे.
उपरकर पुढे म्हणाले, साकव दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून ३२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांना सांगायला हवे होते. मात्र, तसे न करता राणे हे ग्रामविकास मंत्र्यांकडे पत्रव्यहार करून निधी मागत आहेत. पण, ग्रामविकास खात्याकडून साकव दुरुस्तीसाठी निधी मिळेल, याविषयी कोणतीही शाश्वती नाही. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून अनेक साकव नादुरुस्त असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी लाकडी साकव बांधले आहेत. अनेक ठिकाणी साकवांचे भराव वाहून गेले आहेत. कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी येथील साकव वाहून गेल्यानंतर तेथे लाकडी साकव बांधला गेला. त्याच साकवावरून शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ प्रवास करत आहेत. अगदी स्मशानभूमीतही त्याच साकवावरून जावे लागत आहे. एकीकडे कुडाळचे स्थानिक आमदार नीलेश राणे हे आमचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टिक करत राहतात. वास्तविक गोवेरी येथील साकव स्थानिक आमदारांनी बांधून देण्याची गरज होती. कुडाळ मतदारसंघातील अणाव – मांजरेकरवाडी येथेही साकवाचा भराव वाहून गेला आहे. तेथेही ग्रामस्थांना साकवावरून चालताना कसरत करावी लागत असल्याचेही उपरकर म्हणाले.
नारायण राणे खासदार असून हायवे, टेलिफोन हे विषय त्यांच्या अखत्यारीत आहेत. पण, या समस्यांबाबत राणेंनी कधी कुणाशी पत्रव्यवहार केला नाही. विमानतळ समस्यांच्या बाबतीतही त्यांनी केवळ घोषणाबाजीच केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सर्व खात्यांतील निधी वापरला जात असल्यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून ३०० कोटी रुपये आणण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारी तिजोरीच रिकामी असल्याने हा निधी मिळणारही नाही. नारायण राणेंनी आपला खासदार निधीही खर्च केला नाही, तो साकवांच्या कामांसाठी वापरणे गरजेचे होते, असेही उपरकर म्हणाले.