आजच्या तरुण पिढीने शाहू महाराजांचा वैचारिक व कृतिशील वारसा पुढे चालवत सामाजिक न्यायचा जागर करायला हवा…

प्रा.डाॅ.एम.एन.वालावलकर ; गोगटे वाळके महाविद्यालयात शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी..

⚡बांदा ता.२७-: सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे लोकराजा म्हणून राजषीॅ छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख गौरवाने करावा लागेल, राजवैभवाचा गाजावाजा न करता रयतेच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे छत्रपती शाहूमहाराज समाजासमोर आदर्श आहेत. कला, संस्कृती, क्रीडा , शिक्षण व कृषीविषयक जाणीवा यांना राजाश्रय देऊन या घटकांना सक्षम करण्यात व त्या समाजात रुजवण्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य गौरवास्पद आहे. आजच्या तरुण पिढीने शाहू महाराजांचा वैचारिक व कृतिशील वारसा पुढे चालवत सामाजिक न्यायाचा जागर करायला हवा हीच त्यांच्या विचारांना आणि व्यक्तिमत्त्वाला खरी मानवंदना ठरेल ” असे प्रतिपादन प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांनी येथे केले

  येथील गोगटे -- वाळके महाविद्यालय,  बांदाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. वालावलकर हे  बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी.कार्वेकर हे होते.
 यावेळी डाॅ. वालावलकर पुढे म्हणाले की, " कोल्हापूर परिसरातील अनेक धरणांची बांधणी ही कृषीनिष्ठ दृष्टिकोनातून शाहू महाराजांनी केलेली दिसते. कुस्ती या मैदानी खेळाच्या  माध्यमातून एक क्रीडाविषयक चळवळ संपूर्ण देशभरामध्ये रुजवण्याचे कार्य य लोकराजांने केलेले आहे . शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत  नेण्याचे महान कार्य छत्रपती शाहू महाराजांनी  केलेले  आहे. शिक्षण,  ज्ञान कला,  क्रीडा आणि संस्कृतीची अनेक दालने त्यांनी आपल्या कारकीर्दीत समाजासाठी समर्पित केली.  अनेक लघुव्यवसायांना    प्रोत्साहित करीत अनेकांना जीवनात उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे  लोकराजा छ.शाहूमहाराज आजही जनमानसात तितक्याच पध्दतीने आदराचे स्थान असल्याचे दिसते.    तत्कालीन कालखंडातील अनेक समस्यांना तोंड देत सामाजिक न्यायाची बांधणी करणारा लोकराजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे कर्तृत्व आभाळा एवढे  मोठे आहे. त्यांच्या विचारांचा व कृतिशील  जगण्याचा शोध घेण्यासाठी त्यांच्यावर आज विविध दृष्टिकोनातून संशोधन होत आहे आणि या संशोधनाच्या माध्यमातून त्यांचा एकूण जीवन प्रवास उलगडला जातो आहे हीच खरी त्यांना आदरांजली ठरत आहे ." 
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  आजीवन शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा.यु.टी.परब यांनी केले.यावेळी प्रा.डाॅ.एन. डी.कार्वेकर यांनी अध्यक्षीय मनोगतात छत्रपती शाहूमहाराज यांच्या कार्याची मांडणी केली. यावेळी प्रमुख वक्ते डाॅ.वालावलकर यांच्या हस्ते छ.शाहूमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाच्या प्रा.डाॅ. रश्मी काजरेकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. निरंजन आरोंदेकर यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page