बांद्यात २२ फेब्रुवारी रोजी शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.३०-: मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.) लक्ष्मीबाई परशुराम नाईक स्मरणार्थ शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे.
पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी व दुसरा गट इयत्ता आठवी ते दहावी असा आहे. पहिल्या गटासाठी ‘माझे गाव माझे ग्रंथालय’, ‘वाचनाचे महत्व’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. शब्दमर्यादा ५०० शब्द असून वेळ एक तास ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या गटासाठी ‘वाचाल तर वाचाल’, ‘माझा आवडता लेखक’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. शब्दमर्यादा ८०० शब्द असून वेळ १ तास ठेवण्यात आला आहे.
सदर स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे. या स्पर्धेत एका गटात एका शाळेतील चार विद्यार्थी स्विकारले जातील. ही स्पर्धा वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे. स्पर्धकांनी व स्पर्धक शाळांनी आपली नावे वाचनालयात दिनांक २० फेब्रुवारी पर्यंत आणून द्यावीत व अधिक माहितीसाठी या नंबरवर ९४०५५७०३४९ संपर्क साधावा.

You cannot copy content of this page