उबाठाचे रुपेश राऊळ यांचा दीपक केसरकर यांना प्रश्न:येणाऱ्या काळात भंपक आमदाराला घरी बसवा, असे एकेरी भाषेत केले जनतेला आवाहन
⚡सावंतवाडी ता.०१-: दहशतवाद संपवला असे म्हणणाऱ्यांनी काल बाऊन्सर आणून जो काय प्रकार केला त्याबाबत ते आता गप्प का..? असा सवाल उभाठा सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी नाव न घेता केसरकर यांना केला आहे. दरम्यान आज पर्यंत दीपक केसरकर यांनी या मतदारसंघात फक्त घोषणाबाजी आणि गजाली मारण्याचे काम केले. प्रत्यक्षात मात्र त्यांनी काही काम केलं नाही. निवडणुका आल्या की ते नवीन नवीन उद्योगपती घेऊन ये. त्यामुळे जनतेने हे ओळखून येणाऱ्या निवडणुकीत या भंपक आमदाराला घरी बसवायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
श्री राऊळ पुढे म्हणाले की बाऊन्सरची संस्कृती काही लोक व्यक्तिशः वापरत असताना आता ती टेंडरच्या कामात देखील काही लोक वापरू लागलेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाउन्सरचे फॅड तर येणार नाही ना..? अशी शंका काही लोकांना येऊ लागली आहे. त्यामुळे निश्चितच जनता येणाऱ्या काळात अशा पक्षाला किंवा त्या लोकांना नक्कीच थांबवेल असा विश्वास रुपेश राऊळ यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान जिल्ह्यातील ठेकेदारांची किंवा पक्षातील पदाधिकाऱ्यांची बाउन्सर वापरण्याची हिंमत झालीच कशी ? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे या मागचा कोण सूत्रधार आहे ? याचा शोध देखील पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे. तसेच लवकरच आम्ही या संदर्भात ते टेंडर रद्द करण्याची मागणी देखील निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
