जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरूवात…

⚡सावंतवाडी ता.२६-: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्गातील गावागावात जाण्याचे नियोजित केले होते. त्यानुसार वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात दोन टप्पे पार पडले‌. तिसऱ्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यात ही यात्रा पोहचत असून उद्या शुक्रवारपासून त्याला सुरूवात होते आहे, अशी माहिती कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी दिली.

तालुक्यातील नागरिक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. आपले मूलभूत हक्क जसे की, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, स्वतःच्या गावी स्वतःच्या तालुक्यात हाताला काम म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार, शेतीमालाला हमीभाव, आमच्या सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबे, विजेची समस्या, आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या आहेत. हे सगळे आमचे हक्क आहेत. या आणि अशा इतरही सगळ्या हक्कांसाठी, या हक्कांचा जागर करण्यासाठी, या यात्रेच्या निमित्त सावंतवाडी तालुक्यातील गावागावात जाणार आहोत. आपल्या हक्कांचा जागर करणार आहोत. जनसामान्यांना हेही सांगणार आहोत की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शक्ती दिली आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला ताकद दिली आहे, मतदानाच्या अधिकाराच्या रूपाने !! त्या शक्तीची, त्या ताकतीची देखील जाणीव या निमित्ताने आम्ही लोकांना करून देणार आहोत. आपले हक्क प्राप्त करण्यासाठी या शक्तीचा वापर करण्याची वेळ आलेली आहे. वेंगुर्ला व दोडामार्ग नंतर ही यात्रा सावंतवाडीत येणार होती‌. मात्र, राष्ट्रवादी परिवाराचे सदस्य कै. राकेश नेवगी यांच्या निधनामुळे तालुक्यातील यात्रा स्थगित केली होती. उद्या २७ सप्टेंबर पासून तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होते आहे. आमचे हक्क प्राप्त करण्यासाठी शांततेच्या, अहिंसेच्या आणि संविधानिक मार्गाने आम्ही प्रयत्न करू. या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करून या व्यवस्थेला जागे करू. जाग आणण्याचा काम करू.
आपल्या माध्यमातून मला तमाम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सांगायचे आहे. आम्ही आपल्या गावी आपल्या वाडीवर, आपल्या वस्तीवर, आपल्या हक्कांचा जागर करण्यासाठी आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जाणीव जागरण यात्रेच्या निमित्ताने येत आहोत आपणही मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हा असे आवाहन सौ.‌ घारे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page