सावंतवाडी दि.२ सप्टेंबर (प्रतिनिधी)
गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील वाहतूक, पार्किंग व्यवस्था आणि भक्तांना बाजारहाट करण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आली आहे असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण व नगरपालिका प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांनी शांतता समितीच्या बैठकीत माहिती दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, रिक्षा युनियनचे सरचिटणीस सुधीर पराडकर, अँड नकुल पार्सेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, ऑगोस्तीन फर्नांडिस, व्यापारी प्रतिक बांदेकर, आसिफ बिजली, अभय पंडित, रिक्षा तालुका अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, शैलेश गवंडळकर,उमेश सावंत, सदानंद धर्णे, संजय गावडे, सुनील राणे, तुषार राऊळ, दिपक पाटकर, सचिन परब, भरत सावंत, रामचंद्र राऊळ आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात सात सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्सवमूर्ती आहेत. त्याशिवाय घरगुती मुर्ती पुजन होणार आहेत. शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून एसटी बस दि.५ व ६ सप्टेंबर रोजी राजवाडा दिशेने जाणार आहे. तसेच बाजारात मोठी वाहने या दोन दिवसात अवेळी येणार नाहीत अशी खबरदारी घेतली जाईल असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
शहरात बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना सुलभपणे बाजारात येण्याजाण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत आहे. गणेश चतुर्थी निमित्त माठी सामन विक्रेत्यांना देखील बसण्याची जागा उपलब्ध करून दिली जाईल असे नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांनी सांगुन गणेश विसर्जन प्रसंगी तलावाच्या काठावर चार्जिंग वीज दिवे लावले जाणार आहेत. त्यामुळे वीज खंडित झाली तर अडचण निर्माण होणार नाही असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरात वाहतूक पोलीस व होमगार्ड ठेवून पार्किंग व्यवस्था व रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागणार नाही अशी खबरदारी घेतली जाईल असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. तसेच श्री गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने घर, फ्लॅट बंद असतील म्हणून गस्तीवर भर दिला जाईल. सर्व गणेश भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले.
