जनता दरबारातून किती प्रश्‍न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे…

आ. वैभव नाईक:केसरकर आणि चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे जमिनीच्या वादातून..

कणकवली : जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्‍न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान आज आमदार वैभव नाईक यांनी दिले. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे होत आहे, असा गौप्यस्फोटही केला. येथील विजय भवन येथे श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्‍हणाले, केंद्राच्या कॅबिनेटमध्ये नारायण राणे होते. तर उदय सामंत आणि त्‍यानंतर आता रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर दीपक केसरकर यांच्याकडे देखील मंत्रिपद आहे. एवढे तीन मंत्री असून देखील सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्‍यामुळे पालकमंत्र्यांनी गेल्‍या आठवड्यात जनता दरबार आयोजित केला. आता या जनता दरबारातून सर्वसामान्यांचे किती प्रश्‍न मार्गी लागले हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे.

अन्यथा जनता दरबार हा केवळ निवडणुकीचा फार्स होता हे स्पष्‍ट होईल. श्री.नाईक म्‍हणाले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात सध्या शीतयुद्ध रंगले आहे. हे शीतयुद्धामागे राजकीय कुरघोडी नाही तर जमिनीचा वाद हे मुख्य कारण आहे. ही बाब आता सर्वसामान्य जनतेला देखील कळून चुकली आहे. दरम्‍यान पालकमंत्री चव्हाण हे प्रत्‍येक गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होणार असल्‍याचे जाहीर करतात. प्रत्‍यक्षात चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होत नाही. त्‍यामुळे कुठल्‍या वर्षीच्या गणेशोत्‍सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल हे देखील पालकमंत्र्यांनी जाहीर करायला हवे. कुडाळ मतदारसंघातून सर्वाधिक तक्रारी आल्‍याचे भाजपचे काही स्वयंघोषित पुढारी सांगत आहेत. पण जनता दरबारातील सर्वाधिक तक्रारी ह्या भाजप कार्यकर्त्यांच्याच होत्या. भाजप कार्यकर्त्यांचे जिल्‍हाधिकारी ऐकत नाहीत. त्‍यांची कामे करत नाहीत अशा तक्रारी नोंदविण्यात आल्या. जर जिल्हा प्रशासन भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरत असेल तर पालकमंत्र्यांचा जनता दरबार काय कामाचा? असाही प्रश्‍न श्री.नाईक यांनी उपस्थित केला.

You cannot copy content of this page