कणकवली : कवी अजय कांडर यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बहुचर्चित ‘आवानओल ‘काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल ‘ हा समीक्षा ग्रंथ अक्षयवाडःमय प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आल्या आहे.
मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यास प्रसिद्ध कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी हा समीक्षा ग्रंथ संपादित केला असून कवी अजय कांडर यांच्या कवितेतीलवरील हा प्रसिद्ध झालेला तिसरा समीक्षा ग्रंथ आहे. ज्येष्ठ लेखक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ समीक्षक प्रा वसंत पाटणकर, प्रा तारा भवाळकर, प्रा शोभा नाईक, प्रा नंदकुमार मोरे, अनंत मनोहर, प्रफुल शिलेदार, प्राचार्य गोविंद काजरेकर, वीरधवल परब, नामदेव गवळी, गणेश वसईकर, भालचंद्र दिवाडकर, संध्या तांबे, धम्मपाल रत्नकर,, डॉ विद्यालय करंदीकर, प्रा संजीवनी पाटील, प्रा देवानंद सोनटक्के, भालचंद्र दिवाडकर आधी 18 समीक्षकांनी लिहिलेल्या समीक्षा लेखनाचा या ग्रंथात समावेश आहे. तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी ईटीव्ही संवाद या मुलाखत कार्यक्रमात कवी कांडर यांच्या घेतलेल्या मुलाखतीचाही समावेश या समीक्षा ग्रंथात करण्यात आला असून या मुलाखतीचे शब्दांकन प्रा. लालासाहेब घोरपडे यांनी केले आहे. तर लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तारा भवाळकर यांनी कवी कांडर यांच्या गौरव समारंभात केलेल्या भाषणाचे शब्दांकन प्रा अनिल फरकटे यांनी केले आहे. या समीक्षा ग्रंथाच्या संपादकीय मध्ये प्रा.डॉ. आसोलकर म्हणतात, मराठी कवितेत आजवर एकूण झालेल्या स्त्रीचित्रणात नवे अलक्षित व महत्त्वपूर्ण भर घालणारे ‘आवानओल ‘मधील चित्रण ठरते. त्यातून कांडर यांच्या कवितेतील काव्य लेखनाचा स्वतंत्र चेहरा प्रकट होतो.
लोकपरंपरेत जवळ जाणारी चित्रमय शैली आणि मिताक्षरी सामर्थ्य असणारी ही कविता आहे. बदलत्या ग्रामीण वास्तवाची अनेक रूपे रेखाटताना हा कवी वाचकाला अंतर्मुख करतो. हे या कवितेचे मोठे वैशिष्ट्य आहे. या पार्श्वभूमीवर ‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथामधील लेखन या सगळ्याची नेमकेपणाने चर्चा आणि चिकित्सा करते. ‘आवानओल’ हा 2005 साली काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर या संग्रहाला वाचक आणि अभ्यासकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र फाउंडेशनसह विशाखा, इंदिरा संत असे मराठी साहित्यातील महत्वाच्या बारा पुरस्काराने या संग्रहाला सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू, कानडी आदी भारतीय भाषांमध्ये या संग्रहातील कविता भाषांतरित झाल्या.
त्याचबरोबर मराठीतील नामवंत समीक्षकांनी या संग्रहावर स्वतंत्र लेखन केले. तसेच या संग्रहाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध ठिकाणी कवी कांडर यांच्या मुलाखती झाल्या. या सगळ्या लेखनाचे प्रा. डॉ. आसोलकर यांनी साक्षेपी संपादन ‘ओल अनमोल आवानओल ‘ या समीक्षा ग्रंथात केले आहे.
