मिलिंद सावंत:मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक सुरू असल्याचा केला आरोप..
⚡सावंतवाडी ता.३०-: आंबोली मार्गे होणारी अवजड वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार दाणोली चेक पोस्ट पोलीस कर्मचाऱ्यांना मदत.आशी माहिती मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली.दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात आंबोली घाट मार्गे अवजड वाहतूक नियमानुसार बंद कालावधी असताना सुद्धा या घाट मार्गे दहा चाकी,बारा-चौदा चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले की दरवर्षी पावसाळ्यात आंबोली येथील धबधबे प्रवाहीत झाल्यावर या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी पूर्ण राज्यातून तसेच शेजारील गोवा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यात या अवजड वाहनांमुळे आंबोली मुख्य धबधबा या ठिकाणी कोंडी होत असल्याने त्या ठिकाणच्या स्थानिक व्यावसायिक तसेच बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांवर ट्राफिकचा फार मोठा ताण पडत असतो.
अशाप्रकारे अनधिकृतित्या बेदरकारपणे होणारी अवजड वाहतूक करणारे पोलीस प्रशासनास जुमानत नसतील तर येत्या दोन दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक दानोळी चेक पोस्ट जवळील पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला आहे.
