मालवण समुद्रातील मच्छिमार बोटीला हायस्पीड ट्राॅलर कडून धडक…

बोटीचे मोठे नुकसान ; नऊ जण बालंबाल बचावले..

मालवण ता.२०-: मालवणच्या खोल समुद्रात बारा नौटिकल मध्ये नांगरून ठेवण्यात आलेल्या मालवणच्या आशा मोहन शिरसाट यांच्या मालकीच्या विश्वेश्वर प्रसाद (आय. एन. डी. एम. एम ०५ – ३०५२) या मच्छिमारी बोटीला शुक्रवारी मध्यरात्री परराज्यातील मच्छिमारी करणाऱ्या हायस्पीड ट्रॉलर च्या समूहातील एका ट्रॉलरने जोरदार धडक देत पलायन केले या धडकेमुळे श्री. शिरसाट यांच्या फायबर बोटीचे मोठे नुकसान झाले असून या बोटीवरील नऊ जण बालबाल बचावले आहेत

दरम्यान आज सकाळी दुसऱ्या एका बोटीच्या सहाय्याने शिरसाट यांची ही बोट मोठ्या प्रयत्नाने मालवण समुद्र किनारी आणण्यात आली आहे. एकूणच या प्रकाराने स्थानिक मच्छिमार आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर यांच्यातील वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे

या घटनेनंतर मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे यावेळी जोगी म्हणाले, एकीकडे राज्य आणि केंद्र सरकारने खोल समुद्रातील मच्छिमारीवर बंदी घातली असतानाही मालवणच्या किंबहुना सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यातील एलईडी आणि हायस्पीड मच्छिमारी टॉलर्सचा हैदोस सुरुच आहे. केंद्राच्या अखत्यारीत असणाऱ्या खोल समुद्रातच बेकायदेशीररित्या परराज्यातील टॉलर्सचा धुमाकूळ सुरु असल्याचे मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने राज्य आणि केंद्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाला वेळोवेळी कळवूनही परराज्यातील टॉलर्सची बेकायदेशीर मच्छिमारीला आळा बसलेला नाही असे सांगून श्री. जोगी म्हणाले मालवणच्या मस्यव्यवसाय विभागाने केंद्रसरकारला वेळीवेळी कळवूनही केंद्र सरकार दखल घेत नाही त्यामुळे मंगळवारी मालवणात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना जाब विचारण्याची पाळी मच्छिमारांवर आल्याचे श्री जोगी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page