⚡मालवण ता.२९-: भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहिम दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत विहीत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध योजनांबद्दल जनजागृती करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी सुसंवाद साधणे तसेच या मोहिमेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे इ. उद्दीष्टे साध्य करावयाची आहेत. या अनुषंगाने मालवण शहरात “विकसित भारत संकल्प यात्रा” अभियान रथाचे आगमन शनिवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत बाणावलीकर कंपाऊंड, भरड नाका मालवण येथे होणार आहे.
यावेळी केंद्र शासनाच्या पी.एम. स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, आयुष्यमान कार्ड शिबिर, मुद्रा लोन योजना, आधारकार्ड अद्यावत करणे यासारख्या विविध योजनेची माहिती व लाभ देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थी व नागरिकांनी या अभियानात सहभागी होवून विविध योजनेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी केले आहे.
