भाजपा शहर महिला कमिटीची वनविभागाकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेडला माडाची बेसुमार तोड होत असून, या झाडाची होणारी ही कत्तल व होणारी तस्करी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी भाजप शहर महिला कमिटीने वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या झाडांची तोड करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे. तसेच या झाडाची नोंद शेड्युल ट्री म्हणून नोंद करण्याची शिफारस त्वरित शासनाकडे करण्यात यावी, अशी मागणी भाजपा शहर महिला कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन भाजपच्या महिला शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगांवकर यांनी उपवनसंरक्षक एस.डी. नारनवर यांना दिले. यावेळी वनरक्षक पूजा खंडागळे, भाजपच्या शहर सरचिटणीस मेघना साळगावकर, परिणीती वर्तक, प्राजक्ता मुद्राळे, सुकन्या टोपले, बेला पिंटो आदी उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत भेडला माड जातीच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे तोड होत आहे. या झाडांची तोड करून प्रवासीबस मधून त्यांची वाहतूक मुंबई तसेच पुणे येथे करून प्रचंड प्रमाणात पैसा कमविला जात आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा परवानगीची गरज दिसत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्याची गरज नाही. अश्या या अनधिकृत व्यवसायामध्ये परप्रांतीय लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. हे परप्रांतीय लोक अशा जंगलांमध्ये जाऊन वृक्षतोड करून ती झाडे बसच्या साह्याने मुंबई तसेच पुण्याच्या ठिकाणी नेत आहेत. यासंबंधीचे व्हिडीयोही रोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. भेडला माड हे झाड निरुपयोगी वाटत असले तरी त्या झाडावर अनेक वन्यप्राण्यांची उपजीविका अवलंबून आहे जसे की शेकरू, माकड, धनेश आणि अन्य प्राण्यांचे मुख्य अन्न हे ह्या झाडांची फळे आहेत. याच कारणाने अनेक प्राण्यांचे वास्तव्य ह्या झाडावर असते. हि झाडे घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यांचे प्रमाण खूप आहे. मूळात या झाडांचा उपयोग मनुष्यास नसल्याने त्यांच्या संवर्धनाबाबतीत कोणीच विचार करताना दिसत नाही. परंतू सध्या होणाऱ्या अपरिमित तोडीमुळे सदर झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात या झाडांच्या पानांचा वापर डेकोरेशन साठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. अशा बेसुमार वृक्षतोडीमुळे ही झाडे लोप पावत चालली आहेत. स्थानिक लोक सुद्धा ह्या तोडीचा विरोध करताना दिसत नाहीत अशा प्रकारच्या उदासीनतेमुळे अशी ऱ्हास मोठ्याप्रमाणात वाढतच चालली आहे. हि झाडे नष्ट झाल्यामुळे ह्या वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीत वळविला आहे आणि आता ते नारळाची सुपारीची झाडे यांच्यावर अवलंबून आहेत त्यामुळे शिकारीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपा महिला शहर कमिटीने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. भाजपा शहर महिला कमिटीने दिलेल्या या निवेदनामुळे उपवनसंरक्षक एस डी नारनवर हे प्रभावित झाले. याबाबत त्वरित कार्यवाहीचे आदेश देण्यात येतील तसेच महिला व वन्य प्रेमींच्या मदतीने या झाडांच्या पुनर्लागवडीसाठी प्रयत्न करणार असून यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल, अशी ग्वाही नारनवरे यांनी महिला समितीला दिली.
