शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा प्रतिटोला:भरभरून देणाऱ्या सिंधुदुर्ग वासियांसाठी काय केले ? ते जाहीर करण्याचे दिले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.२४-: आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवश्य यावे, कार्यकर्त्यांची भेट घ्यावी. परंतु ज्या कार्यकर्त्यांना साधी भेट किंवा दर्शन सुद्धा मिळत नव्हते. आज त्यांच्याच घरोघरी त्यांना फिरण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांना काळाने शिकवलेला हा धडा आहे अशी टिका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. दरम्यान, जिल्ह्यात येऊन गणपतीचे दर्शन घेतले ही चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही या कोकणी जनतेसाठी काय केले, ते आधी तुम्ही सांगा. त्यानंतर माझ्यावर टीका करा, ज्या कोकणी जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले, त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकले नाही हे दुर्दैवी असल्याची टीका देखील मंत्री केसरकर यांनी यावेळी केली. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते. तसेच हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून होता. मग तुम्ही या जिल्ह्यासाठी काय दिले ते सांगा. चांदा ते बांदा सारखी महत्वकांशी योजना देखील गुंडाळण्यात आली. त्यावेळी तुमची अजितदादांसोबत बोलण्याची हिंमत सुद्धा नव्हती. त्यामुळे आता येऊन काही सांगण्यात अर्थ नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. तसेच केसरकर म्हणाले ज्यावेळी आम्ही बोलू त्यावेळी जनतेला सुद्धा कळेल की हे आपल्या सोबत कशाप्रकारे वागत होते. कशामुळे पक्षाचे दोन भाग झाले. त्यावेळी तुमच्यासोबत एकही कार्यकर्ता राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
