ठाकरे शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिंधुदुर्गनगरी ता १२
राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून जिल्ह्यातील शेतकरी वंचीत राहिले आहेत,त्याना गणपती सनापूर्वी विम्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा काजू पिकाचा विमा काढून संबंधित विमा कंपनीकडे भरणा केलेला आहे जिल्ह्यात वारंवार हवामानात होणारा बदल आणि अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फळ पिकाचे नुकसान होते या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्याने शासनाच्या विमा योजनेत उस्फुर्तपणे सहभाग घेत विम्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे भरणा केली आहे मात्र शासनाने वेळीच आपला हिस्सा विमा कंपनीकडे भरणा केल्या नसल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे सुमारे १२० कोटी एवढी मोठी रक्कम विमापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे याबाबत शासनाचे व विमा कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणे आंदोलनात आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते, नीलम सावंत ,जानवी सावंत ,अतुल बंगे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने उभाटा गटाचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते हे आंदोलन सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होते या आंदोलनाच्या माध्यमातून शासन विरोधी घोषणा आणि विम्याचा लाभ गणेश चतुर्थी पूर्वी मिळालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग नगरी परिसर दणाणून टाकला होता सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कोलटकर यांच्यासह सिंधुदुर्गनगरी पोलिसांची टीम या ठिकाणी बंदोबस्तासाठी सकाळपासून तैनात करण्यात आली होती.
आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत.याबाबत आमदार वैभव नाईक यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला असून त्याआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी तात्काळ यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत आमदार वैभव नाईक,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर,संजय पडते यांनी धरणे आंदोलन छेडले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा व काजू पिक विम्याची प्रलंबित नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आज आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी जिल्हा तंत्र अधिकारी सांख्यिकी एस एम काळेल यांच्याशी आंदोलन स्थळी चर्चा केली . त्यांनी या बाबत सविस्तर माहिती देत मंत्रालय पातळीवर आमचा पाठपुरावा सुरू आहे मात्र शासनाकडून विम्याचा हप्ता भरण्यास विलंब झाल्याने संबंधित विमा कंपनीकडून विम्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी सन २०२२-२३ मध्ये ३८ हजार ४६७ शेतकरी सहभागी झाले आहेत. १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. शासन निर्णयानुसार पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते.मात्र पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे. हि रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले अशी माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली .
