⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्गातील रंगकर्मी वामन पंडित यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या जेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा अभिवाचन जागर कार्यक्रमातील दुसरा आणि ऑगस्ट महिन्यातील कार्यक्रम ११, १२ आणि १३ ऑगस्ट रोजी अनुक्रमे निलायम, कणकवली, संवाद परिवार, तरळे आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अभिवाचक जी. ए. च्या कथा सादर करतील. त्यात अभिनेते आणि सिंधुदुर्गचा आवाज अशी ज्यांची ख्याती आहे ते व्हाईस ओव्हर आर्टीस्ट नीलेश पवार जीएंच्या ‘वंश’ या कथेचे अभिवाचन करतील. ‘कारटो’ या पुरस्कार प्राप्त कथासंग्रहाच्या लेखिका आणि उपक्रमशील शिक्षिका कल्पना मलये जीएंच्या ‘गुंतवळ’ या प्रसिद्ध कथेचे अभिवाचन करतील तर तरुण उद्योजिका आणि समाज सेवी संस्थांमध्ये अग्रेसरपणे काम करणारी आजच्या पिढीची तरुणी देवी केळुसकर या ‘जखम’ या कथेचे अभिवाचन करणार आहेत.
या अपूर्व अशा सांस्कृतिक उपक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद देऊन जी. ए. कुलकर्णी शतब्दी संस्मरण कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती आयोजकांकडून केली गेली आहे.
