⚡मालवण ता.११-: कोकणातील प्रत्येक गाव शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव व्हावा. यासाठी कोकणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु होऊन येथील विद्यार्थ्यांना यशाचे द्वार खुले व्हावे, असे प्रतिपादन ‘तिमिरातून तेजाकडे’चे संस्थापक अध्यक्ष,स्पर्धा परीक्षा व्याख्याते, मुंबई सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी,श्री.सत्यवान रेडकर यांनी केले.
सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे आर.ए.यादव हायस्कूल आडवलीच्या सभागृहात आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम शाळा समिती अध्यक्ष श्री.कमलाकांत कुबल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुंबई संस्थेचे सदस्य श्री.अरुण लाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री.सत्यवान रेडकर यांचा कमलाकांत कुबल यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.रेडकर यांचे हे निःशुल्क व्याख्यान होते. स्पर्धा परीक्षेचे विविध पैलू, सामान्य ज्ञान मिळविण्याच्या विविध पद्धती, विविध नोकरी-व्यवसायाच्या संधी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘मन की बात’ या सदराखाली ५० पेक्षा जास्त विद्यार्थांनी त्यांना पत्रे लिहिली. शाळा समिती अध्यक्ष श्री.कमलाकांत कुबल यांनीही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीचा कानमंत्र देऊन कार्यक्रमास शुभेछा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सकपाळ सर यांनी केले तर आभार सौ.पराडकर यांनी मानले.
