⚡सावंतवाडी ता.२७-: बौद्ध समाजातील अनुरूप वधू-वरांचे विवाह सुखकर व्हावेत या उदात्त हेतूने सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेने आयोजित केलेल्या तिसरा वधू वर परिचय मेळावा रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमाचे अनौपचारिक उद्घाटन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर धम्मचारी तेजबोधी यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदनेने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी स्वागत केले. तर कार्याध्यक्ष अरविंद वळंजू यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन मागील मेळाव्यातून जोडलेल्या लग्नांची माहिती दिली. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी इंटरनेटच्या जमान्यातही मध्यस्थीची गरज कशाप्रकारे असते हे सांगून याच माध्यमातून समाजातील विवाह इच्छुक तरुण तरुणींचे संसार जुळविण्याचा हा आपल्या संस्थेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.
शेवटी उपाध्यक्ष आनंद धामापूरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कदम यांनी केले. यावेळी विचार व्यासपीठावर मिलिंद जाधव, देवगड अध्यक्ष विजय कदम, रूपाली पेंडुरकर इत्यादी उपस्थित होते. दरम्यान या परिचय मेळाव्यात सुमारे 40 वधूवरांनी सहभागी घेतला. या उपक्रमाबाबत विशाल वरवडेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
