कणकवलीतील तो बंद एअरटेल टॉवर अखेर सुरू

⚡कणकवली ता.०५-: कणकवलीतील गेले सव्वा महिना बंद स्थितीत असलेला एअरटेल टॉवर सुरू करण्यात आल्याने एअरटेल नेटवर्क सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर यांनी कणकवली बांधकरवाडी दत्त मंदिराजवळ तातडीने ट्रक टॉवर उभारण्याची केलेली मागणी पूर्णत्वास गेल्यानंतर प्रत्यक्षात हा ट्रक टॉवर आज रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती संजय कामतेकर यांनी दिली.

एअरटेल टॉवर बंद असल्याने एअरटेल नेटवर्क ठप्प झाले होते. मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे व गटनेते संजय कामतेकर यांनी एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ हा टॉवर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वेच्या जमिनीतील टॉवर अन्यत्र स्थलांतरित करण्यास काही कालावधी जाणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टॉवर उभारण्याची मागणी समीर नलावडे व संजय कामतेकर यांनी कंपनीकडे केली होती. व त्यानुसार ही मागणी नुकतीच पूर्णत्वास गेली.रविवारी संध्याकाळपासून हा ट्रक टॉवर कार्यान्वित करण्यात आल्याने गेले सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या एअरटेल नेटवर्कची रिंग आता मोबाईलवर वाजणार आहे. या कामाकरिता सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे व गटनेते संजय कामतेकर यांच्या पाठपुराव्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक रवींद्र गायकवाड यांनी या टॉवरच्या ठिकाणी भेट देत आढावा घेतला. या टॉवरमुळे कनकनगर, बांधकरवाडी, परबवाडी यासह अन्य भागातील नेटवर्कची समस्या दूर होणार आहे. तसेच लवकरच एअरटेलचा कायमस्वरूपी टॉवर उभारण्याच्या दृष्टीने कंपनीला जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, लवकरच कायमस्वरूपी टॉवर देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संजय कामतेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page