⚡वेंगुर्ला ता.२७-: तुळस गावातील ज्या नागरिकांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत अशा सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांचा सन्मान सोहळा श्री देव जैतिराश्रित संस्था आणि श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे संपन्न झाला. सुमारे २०० ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि ब्लँकेट देऊन करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवप्रसंगी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नूतन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचे रा.पां.जोशी, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा परब, जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष अॅड. प्रभानंद सावंत, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर, उद्योजक दादासाहेब परुळकर, काकासाहेब झांटये, श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई, उपाध्यक्ष विष्णू परब, देवस्थानचे मानकरी अनिल परब, सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, जयवंत तुळसकर, कृष्णा तावडे, प्रकाश परब, घोडे-पाटील सर यांच्यासह जैतिराश्रित संस्था व वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तुळससारख्या ग्रामीण भागामध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व ग्रामस्थांचा सन्मान होतो ही गोष्ट इतर गावांनी दखल घेण्यासारखी आहे. असे उपक्रम आपली संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन रा.पा.जोशी यांनी केले. वर्षा परब यांनी मालवणी माणसाच्या स्वभावाचे पैलू उलगडत ज्येष्ठांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रत्येकाला आपल्या वतीने ब्लँकेट प्रदान केले. रमेश पिंगुळकर यांनी वृद्धाश्रम आणि आजची कुटुंब व्यवस्था यावर विचार मांडले. तुळस गावात शैक्षणिक चळवळ राबणा-या जैतिराश्रीत संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देऊन झांट्ये काजू उद्योग समूहाच्यावतीने सुधीर झांट्ये यांनी विशेष सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.
