जिल्ह्यात भाजपचे ३० सरपंच आले बिनविरोध निवडून

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा

⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्हातून अंदाजे ४४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून यातील ३० पॅनल म्हणजे ३० सरपंच भाजपचे निवडून आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान, यावेळी केंद्र व राज्यातील भाजप नेत्यांनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी लावणार असल्याचा विश्वास यावेळी तेली यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री. तेली पुढे म्हणाले, पूर्वी भाजप शिवसेना युती असताना तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विकास कामे करताना आम्हाला विचारात घेतले नाही. किंवा त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भाग अविकसित आहे. मात्र आताचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपाचे असल्याने त्या मला नेहमी विचारात घेत आहेत. विकास कामांबाबत आमच्यासोबत चर्चा करत आहेत. आणि त्यांच्याकडेच बांधकाम मंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करणे सुद्धा आता सोपे होईल. भविष्यात ग्रामीण रस्ते दुरुस्त करून कायापालट केला जाईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग,जिल्हा प्रवक्ते संजू परब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे,मनोज नाईक,आनंद नेवगी, एकनाथ नाडकर्णी आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page