⚡मालवण ता.०८-:
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गेली दोन वर्षे सुरू असून या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत श्री शिवराजेश्वर देवस्थान न्यासचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवराजेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू होऊन दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतींना प्लास्टर करण्यापलिकडे या कामाची प्रगती होऊ शकलेली नाही. देवस्थानचा सभामंडप, गाभारा व सभोवतालच्या परिसरातील फरशी कंत्राटदाराने या आधीच तोडली असल्यामुळे देवस्थानची स्वच्छता राखणे मंदिर प्रशासनाला अवघड झाले आहे. वर्षभर साजरे केले जाणारे सण, उत्सव, दर सोमवारी होणारा महाराजांचा पालखी सोहळा तसेच दैनंदिन पूजा-अर्चा पूर्वपरंपरेनुसार दिमाखात पार पाडण्याच्या ३०० वर्षांच्या परंपरेला या खोळंबलेल्या दुरुस्ती कामामुळे गालबोट लागत आहे. अखंड हिंदूस्तानच्या श्रद्धास्थानाची ही दुरवस्था पाहून लाखोंच्या संख्येने येणारे शिवप्रेमी, मंदिर प्रशासन व शासन व्यवस्थेला दूषणे देत निराश होऊन परतत आहेत. या वस्तुस्थितीचा आढावा घेऊन काम प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे, असे सयाजी सकपाळ यांनी म्हटले आहे.
