⚡कणकवली ता.२९-: मुंबई येथे पार पडलेल्या ५५ व्या मुंबई विद्यापीठ आंतर- महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात कणकवली महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रहसन (स्किट ) या कला प्रकारात कास्यपदक प्राप्त केले. यानिमित्ताने सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रहसन(स्कीट) या कला प्रकारातील विजेत्या ठरलेल्या शिवानी वर्दंम,कांचन परुळेकर,
विदिशा यादव,पूर्वाजा सावंत,
अमृता परब,लिझा जाधव
तसेच मिमिक्री कलाप्रकारामध्ये विद्यापीठात यशस्वी ठरलेल्या रिद्धी मोरवेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव मा. विजयकुमार वळंजू, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे उपस्थित होते.
यावेळी संस्था चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या की,
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे. जडणघडण उत्कृष्टरित्या होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्वल करावयाचे असेल तर योग्य नियोजन, प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारीही असली पाहिजे. विद्यार्थी हाच समाजाचा प्राणवायू आहे त्यामुळे त्यांनी समाजातील आपली जबाबदारी ओळखून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहनही डॉ. राजश्री साळुंखे यांनी केले
संस्थेचे सचिव मा. विजयकुमार वळंजू यांनी या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले की,, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीच सोनं केलेे पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती प्रदान करण्याचे काम कला, क्रीडा व सांस्कृतिक विभाग करीत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व कला प्रकारात चमक दाखवून आपल्यामधील कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्यामधील इतर कलागुणांना वाव देऊन आयुष्याच्या प्रगतीकडे देखील लक्ष दिले पाहिजे असे आवाहन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तर प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी, महाविद्यालयाची प्रतिमा उंचावण्याचे काम सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी करत असतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या कला प्रकारांमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी कांचन परुळेकर व सलोनी कदम विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.युवराज महालिंगे व आभार प्रदर्शन प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
