अधिकाऱ्यांनी शेतीमध्ये जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या
⚡मालवण ता.१७-: मालवण तालुका कृषी विभागाच्यावतीने कातवड येथे राबविण्यात आलेल्या “माझा एक दिवस बळीराजासाठी ” या उपक्रमातर्गत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय योजना, कारणमिमांसा समजून घेऊन दैनंदिन शेतीच्या कामात येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात आले
मालवण तालुका स्तरावरील कृषी अधिकारी एक दिवस शेतकऱ्यांसोबत सकाळपासुन संध्याकाळ पर्यंत व्यतीत करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत.दैनंदिन शेतीच्या कामात येणाऱ्या अडचणी त्याच्या सोबत कामात सहभाग घेऊन चर्चा करून निरसन करणे अपेक्षित आहे यावेळी सरपंच श्री.उदय नाईक, उपसरपंच श्री. गणेश चव्हाण, मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी, कृषी पर्यवेक्षक श्री.धनंजय गावडे,विस्तार अधिकारी पंचायत समिती मालवणचे श्री.व्ही.के.जाधव ग्रामसेवक श्रीम.युती चव्हाण, कृषी सहा. श्री.पवनकुमार सौंगडे, श्रीम. भाग्यश्री चव्हाण,सदस्य श्री. गजानन खोत, श्री.सुरेश परब, श्री. वैभव नाईक, श्री.शिवराम चव्हाण, श्री. प्रभाकर सावंत, श्री. विजयकुमार हळदणकर व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची श्री. विश्वनाथ गोसावी यांनी संकल्पना विषद केली
कातवड येथे श्री.शिवराम चव्हाण यांच्या शेती क्षेत्रावर उपस्थित अधिकारी व इतर शेतकऱ्यांसोबत भेट देऊन त्यांचा प्रक्षेत्रावरील पिकांची पाहणी करून सध्यस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी त्यांनी लागवड केलेल्या गुलाब व सोनचाफा लागवडीची पाहणी करून त्यांची छाटणी व व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. नंतर ते उत्पादित करीत असलेल्या आंबा पिकापासून प्रक्रिया करण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) बाबत सविस्तर माहिती देऊन सहभाग नोंदविण्यास सुचविले. मिरी लागवड पाहणी करून लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी माहिती दिली. नंतर श्री.चव्हाण यांच्या भातपिकावर नॅनो युरीया फवारणी प्रात्यक्षिक घेऊन श्री. धनंजय गावडे यांनी उपस्थितीतांना माहिती दिली.उपस्थित शेतक-यांच्या समस्या काय आहेत याबाबत निवेदने प्राप्त करून घेण्यात आली.उपस्थित शेतक-यांपैकी शेत पिकाची पाहणी करून किड/रोग उपाय योजना बाबत माहिती दिली.कृषि विभागाकडील विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी श्री. व्ही. के. जाधव यांनी पंचायत समिती कडील योजनांची माहिती देऊन सहभाग घेण्यास सुचित केले.यावेळी इतर शेतक-यांच्या उपक्रमांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री.पवनकुमार सौंगडे कृषि सहाय्यक यांनी केले.
या उपक्रमाअंतर्गत २३ सप्टेंबर रोजी मौजे तळगाव व दिनांक ३० सप्टेंबर रोजी मौजे कोईळ या गावांमध्ये भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली.
