मंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे पुन्हा सिद्ध;तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा युवासेनेच्या गुणाजी गावडे यांचा इशारा
सावंतवाडी : भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या सोनुर्ली येथील माऊली मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणाला महीना उलटून गेला तरी पोलिस यंत्रणेचे हात अजूनही रिकामी आहे, एकूणच पुन्हा एकदा मंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भक्तांच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे अन्यथा सोनुर्ली गावकर मंडळी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पोलिस ठाण्यावर मोर्चा काढू असा इशारा युवासेना समन्वयक तथा वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांनी दिला आहे.
श्री गावडे यांनी पत्रक प्रसिद्ध दिले असून त्यात असे म्हटले की,
कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील माऊली मंदिरात महिन्याभरापूर्वी चोरी झाली चोरट्याने मध्यरात्री च्या सुमारास मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करत पाच किलो वजनाची चांदीची प्रभावळ चोरून नेली तसेच फंड पेटी ही फोडली होती. चोरट्याचे मुख्य गाभाऱ्यातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून,त्यात चोरट्याचा स्पष्ट चेहरा ही दिसत आहे.त्यावरून पोलीसांनी सर्व यंत्रणा लावून या चोरीचा तपास ही केला.पण सुरूवातीच्या तपासात पोलिसांच्या हाती काहिच लागले नाही.
एकीकडे गावकर मंडळी व भक्तांची नाराजी लक्षात घेता खुद्द शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंदिराला भेट देऊन सर्व पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी बोलावले होते यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत या गुन्ह्याचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते तसेच चोरट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता एकूणच यानंतर महिना उलटून गेला तरी पोलिसांना काहीच हाती लागले नाही अद्यापही चोरटे मोकाटच असून पुन्हा एकदा मंत्री दीपक केसरकर यांचे प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येत आहे.
सोनुर्ली माऊली देवी संपूर्ण महाराष्ट्रात भक्तांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात झालेली चोरी म्हणजे एक प्रकारे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे सध्या मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पद आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे मग केसरकर यांनी सर्व ताकद लावून या चोरीचा छडा लावणे आवश्यक असताना केवळ आश्वासन देऊन ते नामा निराळे राहिले आहेत त्यामुळे येत्या आठ दिवसात चोरीचा छडा न लागल्यास शिवसेनेच्या माध्यमातून गावकर व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा श्री गावडे यांनी दिला आहे.
