नांदगाववासीयांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला
⚡कणकवली ता.०७-:
कणकवली तालुक्यात दुपार पासून सुमारे चार तास मुसळधार पाऊस सुरू होता. यातच नांदगांव येथे मुंबई गोवा महामार्गालगत पुरेशी गटार व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी नांदगाव परिसरातील घरांमध्ये गेले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग रोको आंदोलन सुरू केले.
त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
महामार्ग चौपदरीकरण करताना महामार्ग ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने गटारांचे बांधकाम केले. त्यामुळे गेली दोन वर्षे पावसाळ्यात नांदगाव परिसरातील घरांमध्ये पावसाने पाणी जाऊन नुकसान होत आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी उपोषण केले होते. त्यावेळी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली होती. मात्र,ठेकेदाराकडून प्रत्यक्षात काम झाले नाही. आज होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका येथील घरांना बसला आहे. घरांमध्ये पाणी गेल्याने येथील नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग रोको आंदोलन सुरू केले.
