करूळ घाटातील संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे…

भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचा आरोप; कामाच्या सखोल चौकशीची मागणी…

वैभववाडी संजय शेळके
करूळ घाट मार्ग परजिल्ह्यातील ठेकेदारांसाठी कुरण बनला आहे. अतिवृष्टीत कोसळलेली संरक्षक भिंतीचे करण्यात आलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर कामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. ठेकेदार व अधिकारी यांची या कामात मिलीभगत आहे. या बांधकामाकडे अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. असा आरोपही काझी यांनी केला आहे. करूळ घाटातील संरक्षक भिंत ८ आॅगष्ट रोजी कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या मार्गावरून केवळ हलक्या वाहनांना ये -जा करण्यास परवानगी देण्यात आली. संबंधित विभागाने या संरक्षक भिंतीचे काम पर जिल्ह्यातील ठेकेदाराला दिले. त्या ठेकेदाराला या घाटाचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्या ठेकेदाराने कामासाठी लागणारी वाळू व इतर साहित्य हे निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. काम सुरू असताना या कामाबाबत वाहन चालक व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करुन प्रवाशांच्या जिवीताशी कोण खेळत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. या झालेल्या निकृष्ट कामाबाबत आमदार नितेश राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे नासीर काझी यांनी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page