विभागीय कार्यालयाचे पूर्णतः दुर्लक्ष
⚡देवगड ता.२४-: देवगड आगाराच्या अपुऱ्या ,गाड्या,नादुरुस्त गाड्या, अपुरा स्पेअर पार्ट पुरवठा या कारणामुळे बोरिवली ,पुणे,रत्नागिरी सांगली, सावंतवाडी या प्रवासी फेऱ्यांबरोबर ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्यांसह १७ प्रवासी फेऱ्या ३१ जुलै पर्यंत बंद ठेवून स्थानिक प्रवासी वर्गाची गैरसोय केली आहे.या कडे विभागीय कार्यालयाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधीही या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाहीत हेही तितकेच खरे आहे.
देवगड आगाराने उन्हाळी हंगामात तसेच आषाढी पंढरपूर यात्रा उत्सव काळात प्रवासी सेवा उत्तमप्रकारे केली असली तरी स्थानिक प्रवासी वर्गाला अपेक्षित सेवा देण्यात असमर्थ ठरत आहे.
वास्तविक पाहता देवगड हुन मुंबई बोरीवलीकडे जाणारी एकमेव रातराणी प्रवासी फेरी (शयनासनी)असून परशुराम घाट बंद झाल्यावर ही प्रवासी फेरी बंद करण्यात आली ती आजमितीपर्यंत व ३१ जुलै पर्यंत बंद रहाणार आहे.त्यांचंबरोबर देवगड पुणे रातराणी,देवगड सांगली,देवगड नांदगाव मार्गे रत्नागिरी ,या प्रवासी फेऱ्या आषाढी एकादशी गाड्या कमतरता दाखवून बंद केल्या त्या अजूनही बंद व पुढील आठवडाभर बंद रहाणार आहेत.याचे कारण मात्र निश्चित समजत नाही.प्रसंगी कंत्राटी चालक,चालक कम वाहक,अन्य कायम चालक वाहक याना प्रवासी फेऱ्या बंद असल्याने सेवा बजावीता येत नाही.चालक कम वाहक याना अपेक्षित काम मिळत नसल्याने त्यांचीही उपासमार होत आहे.
या सर्व गोष्टी विचारात घेता देवगड तालुक्यातील प्रवासी जनता महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी मात्र चांगलेच हैराण झाली आहेत..
