शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा आरोप
⚡सावंतवाडीत ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गावकर प्रकरणी घाईघाईने सद्य हंगामी मुख्यमंत्र्यांची बैठक लावलेली दाखवून हा प्रलंबित प्रश्न मी कसा सोडवत आहे हे दाखवण्याचा असफल प्रयत्न करणारे अपात्र आमदार दिपक केसरकर हे आंबोली, चौकूळ,गेळ या तीनही गावातील ग्रामस्थांबरोबर जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले की त्यात असे नमूद केले आहे की, फंदफितूरी आणि बंडखोरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार घात करून पाडण्यात आले. आणि नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोनच मंत्र्यांचे शपथविधी झाले या गोष्टीला आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरी अजून मंत्रीमंडळाचा पत्ताच नाही. राष्ट्रपती निवडणूकीचे कारण पुढे करून वेळ मारून नेली जात आहे. पण खरं तर या शिंदे-फडणवीस सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आहे. आणि मंत्रीपदाच्या वाटपावरून मोठे वाद होत आहेत. हेच मंत्रीमंडळ स्थापनेतील विलंबामागील खरं कारण आहे. असा आरोप त्यांनी केला. तर महाराष्ट्रातील जनतेत या सर्व प्रकाराची उलटसुलट चर्चा होत आहे. संपूर्ण देशात हा एक हास्यविनोदाचा आणि थट्टेचा विषय होत आहे. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या आजतागायत देशात अग्रेसर असलेल्या राज्याच्या उज्वल राजकीय परंपरेचा हा एक तमाशाच मांडलेला दिसून येत आहे. रात्रीच्या अंधारात वेषांतर करून षडयंत्राने बनवलेलं हे दोन मंत्र्यांचे सरकार घटनाबाह्य असून औटघटकेचेच सरकार असणार हे आता सामान्यजनांना देखील समजले आहे. अशीही टीका त्यांनी केली.
