आ दीपक केसरकर यांची उद्धव ठाकरे यांना विनंती
⚡मुंबई दि.०८-: भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सुवर्णमध्य काढावा, वेळ अजूनही गेलेली नाही. अशी विनंती शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एका वृत्तवाहिनीवर बोलताना केली आहे. उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याशी चांगले सबंध आहेत. त्यामुळे यावर योग्य असा तोडगा निघू शकतो. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
केसरकर बोलताना पुढे म्हणाले की “वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंबाबत मी काही बोलणार नाही असं याआधीही मी स्पष्ट केलं आहे. वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला तर मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सगळं चालतं. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत. अमित शाह, नड्डांशी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. काही कारणामुळे जरी दूर गेले असतील तरी जवळ येऊ शकतात. आम्ही आता विधीमंडळात एका गटात आलेले आहोत.
महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. हे काम करत असताना सर्वांनी एका दिशेनं काम करणं महत्वाचं आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय केवळ उद्धव ठाकरेच घेऊ शकतात. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा एवढीच आम्ही प्रार्थना करू शकतो. याबाबतीत मी निश्चितीच आशादायी आहे”, असं दिपक केसरकर यांनी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
