यशस्वी होण्यासाठी जिद्द,परिश्रमाला पर्याय नाही..!

मनीषा गोवेकर यांचे प्रतिपादन

⚡सावंतवाडी ता.२५-: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम गरजेचे आहेत. परिश्रम आणि जिद्दशिवाय कोणतेही यश सहज मिळत नाही, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी आजगाव येथे केले.

आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर, शालेय समिती अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, भोमवाडीचे सरपंच दीपक बाळे, धाकोरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप जाधव, शिक्षक – पालक संघाचे उपाध्यक्ष पद्मनाभ पांढरे, शिक्षक – पालक संघाचे सहसचिव जयवंत मोरजकर, मुख्याध्यापक उत्तम भागीत, ज्येष्ठ शिक्षक अरुण गवस, प्रा. प्रतिभा चव्हाण, शाळा समितीचे सदस्य दत्तप्रसाद प्रभू, जितेंद्र मोरजकर, उत्तम सातोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक प्राप्त वृश्चिका गोपाळ मसुरकर (९६.२०%), द्वितीय क्रमांक प्राप्त सानिका जितेंद्र मोरजकर (९६%) गौरव रवींद्र खोत (९५%) तृतीय यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट क्रमांक मिळविणाऱ्या तन्वी बाळकृष्‍ण गावडे (९४.२०%), कृपा विश्वनाथ पांढरे (९३.८०), गायत्री सुमंत चराटकर (९२.६०), दिशा न्हानू पांढरे (९१.२०), मयुरी महेश पालयेकर (९१.२०), शरद संतोष सातोस्कर (९०.२०), ललित उत्तम सातोस्कर (८९%) यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले अण्णा झांट्ये म्हणाले की, आजगाव शाळेची उत्कृष्ट निकालाची परंपरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कायम ठेवली, याचे सर्व श्रेय शिक्षक, मुख्याध्यापक आणि हुशार विद्यार्थ्यांना जाते. अशीच परंपरा कायम जोपासावी, यासाठी आमचे सहकार्य कायम राहील, असेही झांट्ये म्हणाले. मुख्याध्यापक उत्‍तम भागीत यांनी सांगितले की, शाळेचा शंभर टक्के निकाल लावण्याचा दरवर्षी प्रयत्न आम्ही करतो. तो विद्यार्थ्यांच्या मेहनतीने यशस्वी होतो. यात पालकांचेही सहकार्य आम्हाला लागते, असे सांगत त्यांनी पालकांचे आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक अरुण गवस यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यामुळे व शाळा ग्रामीण भागात असूनही कोविडसारख्या काळातही शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न यामुळे यश मिळाल्याचे गवस यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका काव्या साळवे यांनी तर आभार प्रदर्शन मानसी परूळेकर यांनी केले. यावेळी आजगाव पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक कार्यक्रमास उपस्थित होते.

You cannot copy content of this page