स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आमदार वैभव नाईक खेळत आहेत देवबाग वासियांच्या जीवाशी….

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा आरोप

⚡मालवण ता.०९-: सागरी अतिक्रमणामुळे धोकादायक बनलेल्या देवबाग किनारपट्टीवर सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील बंधाऱ्यासाठी तत्काळ एक कोटी रुपये खासदार निधी जाहीर करून हा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. मात्र बंधाऱ्याचे श्रेय राणे व माजी खासदार निलेश राणे यांना जाईल, या भीतीसह स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वैभव नाईक यांनी हा बंधारा प्रशासनाच्या लालफितीत अडकवण्याचे काम सुरू ठेवले आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आमदार नाईक व कंपनी देवबाग वासियांच्या जीवाशी खेळत आहे. असा आरोप भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून मंजूर देवबाग बंधाऱ्याची फाईल महाराष्ट्र कोस्टल झोन एथॉरिटी चेअरमन याठिकाणी मंत्रालयात किती दिवस ठेवणार आहात ? असा प्रश्न चिंदरकर यांनी केला आहे. वैभव नाईक यांनी ज्या देवबाग मोबारवाडीत भूमिपूजन केले ती फाईल सीआरझेड क्लीअरन्स घ्यायला एक वर्षापेक्षा अधिक काळ लागला. कारण त्यांना देवबागवासियांबाबत कुठलेही देणे घेणे नाही. ते फक्त मतांची बेरीज करतात आणि त्यांच्या या गणितात देवबागवासियांची दिवसांगणिक वजाबाकी करत आहेत. यामागे राणेद्वेषाने पछाडलेले त्यांचे वरिष्ठच झारीतले शुक्रचार्य असतील.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक मिळून देवबागवासियांच्या जीवाशी खेळत असून हा प्रकार देवबागवासिय कधीही विसरणार नाहीत. ज्या एक किलोमीटरच्या अंतरावरील बंधाऱ्याला मंजुरी मिळाली त्याचा डाटा तयार आहे. मग राणेंच्या खासदार निधीतून मंजूर असलेल्या बंधाऱ्याची फाईल तांत्रिक अडचणी काढून फिरवून मतांसाठी लटकावायचा विचार तर तुमच्या डोक्यात तर नाही ना ? आमदारांसह त्रिकुटाने एवढे खालच्या दर्जाचे राजकारण करू नये अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page