देऊळवाडा–आडारी–आंगणेवाडी मार्गावर कचऱ्याचा विळखा;बाबी जोगी यांचा आरोप…
⚡मालवण ता.०६-:
मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर विरोधकांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले असून देऊळवाडा– आडारी– आंगणेवाडी मुख्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडमधील सांडपाण्यायुक्त कचरा रस्त्यावर पसरल्याने वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप
ठाकरे शिवसेना मालवण शहर प्रमुख श्री बाबी जोगी यांनी करीत
मालवण नगरपालिका कारभार म्हणजे ‘बडे-बडे बाते, वडापाव खाते अशी असल्याचा उपरोधीक टोला लगावला आहे
ठाकरे शिवसेना मालवण शहर प्रमुख श्री बाबी जोगी यांनी पत्रकात म्हटले आहे की, मालवण नगरपालिकेकडून स्वच्छतेच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सार्वजनिक रस्त्यावर कचरा पसरत असताना तो तातडीने हटविण्यासाठी आवश्यक उपाययोजना होत नसल्याचा आरोप श्री जोगी यांनी करून नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात वापरली जाणारी जेसीबी, ट्रॅक्टर, घंटागाडी आदी वाहने नंबर प्लेट शिवाय रस्त्यावर धावत असल्याचाही आरोप केला आहे. अशा वाहनांच्या वापरामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करून श्री जोगी यांनी
स्वच्छता कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली जात असताना कामाच्या दर्जाबाबत आणि नियमांच्या पालनाबाबत देखरेख कोण करणार तसेच संबंधित कंत्राटदारांवर कारवाई का होत नाही? त्यांना नेमके कोणाचे संरक्षण मिळत आहे? असे अनेकविध सवाल श्री बाबी जोगी यांनी उपस्थित केले आहेत .
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून रस्त्यावर साचलेला कचरा तातडीने हटवावा, नियमबाह्य वाहनांवर कारवाई करावी आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही श्री जोगी यांनी केली आहे.
