कणकवली 4 जून (प्रतिनिधी)– कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील ग्रामस्थांनी नुकतीच एक ग्रामपंचायत कार्यलयात ग्रामसभा घेऊन समाजातील अनिष्ट अशा विधवा प्रथेला कायमची तिजांदली देत एकमुखी ठराव घेऊन विधवा प्रथा बंद केली.शेर्पे गावच्या सरपंच श्रीम निशा शेलार यांच्या पुढाकाराने हा सामाजिक परिवर्तनशील निर्णय घेऊन ठरावाची प्रत शेर्पे ग्रामपंचायतीच्या शासनाला नुकतीच पाठवून देण्यात आली.
शेर्पे ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. दि.३०मे २०२२ रोजी शेर्पे गावच्या सरपंच श्रीम.निशा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचयत कार्यालयात घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक व निर्णायक सभेमध्ये गावामध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
“आपल्या समाजामध्ये पतीच्या निधनानंतर अंत्यविधी समयी पत्नीचा कपाळावरील कुंकू पुसणे,गळ्यातील मंगळसूत्र तोडणे,हातातील बांगड्या फोडणे,पायातील जोडवी काढणे तसेच सदर महिलेला विधवा म्हणून समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ न देणे हा एक प्रकारे त्या महिलेवर होणारा अत्याचार असून एकप्रकरचा सामाजिक बहिष्कारच आहे. कायद्याने सगळ्या व्यक्तींना जगण्याचा समान अधिकार असताना अशा अनिष्ट प्रथांमुळे विधवा महिलेच्या व्यक्ती स्वतंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे यापुढे आमच्या गावात तसेच देशात प्रत्येक विधवा महिलेला सन्मान जगता यावे या करिता विधवा अनिष्ट प्रथा बंदचा निर्णय घेण्यात आला.असे सरपंच श्रीम.निशा शेलार यांनी सांगितले.
शेर्पे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेल्या या ठरवाला श्री रहिमान महंमद रमदुल हे सूचक तर मधुकर सगुण शेलार हे अनुमोदन आहेत. शेर्पे गावातील जैनवाडी, राणेवाडी,बौद्धवाडी,तांबळवाडी, मुस्लिमवाडी,पाटीलवाडी,भटवाडी या सर्व वाड्यामध्ये सभा घेऊन तेथील नागरिकांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
