गोवा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते अनंत पिळणकर यांचा भास्कर भूषण पुरस्काराने सन्मान

कणकवली ता.२८-:* गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते देशाचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा गोवा येथे महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या भास्कर भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके विविध पदांवर कार्यरत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अल्पावधीत जिल्ह्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे अनंत पिळणकर यांच्या या सन्मानानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. व्यवसायाने शेतकरी असलेल्या अनंत पिळणकर यांची संपूर्ण जिल्ह्याला सर्वात आधी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या गावच्या विकासासाठी आणि गावातील पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी नवीन कुर्ली विकास समिती ता. कणकवली जि. सिंधुदूर्गचे अध्यक्ष म्हणून ते नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत. अखिल भारतीय हयूमन राईटस् संघटणा जि. सिंधूदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यात हिरीरीने सहभाग. कोकण विभागातील सर्वसामांन्य नागरीकापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे यशस्वीपने राबवून कोकणवासीयांसाठी अवीरत सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार राहिलेला आहे. नवीन कुर्ली विकास समिती व अखिल भारतीय हयूमन राईटस् संघटणेच्या मार्फत त्यांनी नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले आहे.

गोव्यातील साखळी येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पडला. यावेळी माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन अध्यक्ष राजीव लोहार, गोवा राज्य पत्रकार युनियन ग्रुप अध्यक्ष किशोर गावकर, गोव्यातील कामगार नेते अजितसिंह राणे सरदेसाई, रवींद्र भवन साखळी गोवा उपाध्यक्ष विठोबा घाडी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

दरम्यान या सन्मानानंतर बोलताना अनंत पिळणकर म्हणाले की, या पुरस्कारामुळे आणखीन जोमाने काम करण्याची स्फुर्ती मला मिळाली आहे. या सोबतच आपली जबाबदारीही वाढली आहे. खरतर या वेळी मी माझ्या कुटुंबीयांचा ऋणी आहे. त्यांनी मला दिलेल्या पाठबळामुळे मी समाजकारण कामात वेळ देऊ शकलो. आगामी काळात मी आणखीन जोमाने काम करून या पुरस्काराची शान नक्कीच वाढवेल असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page