अद्वैत फाउंडेशन आयोजित शिबिर उदघाटन प्रसंगी संध्या नरे-पवार यांचे प्रतिपादन
*कणकवली ता.१६-:* राष्ट्रसेवादल शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये समतावादी, प्रगतिशील विज्ञानवादी विचार रुजवले जातात. राष्ट्रसेवादल चे शिबीर म्हणजे समताधिष्ठित समाज विचारसरणीचे वैचारिक अधिष्ठान असते. आजच्या युवा आणि बाल पिढीवर हे समता आणि विज्ञानवादी विचार रुजविण्याचे काम कणकवली येथील अद्वैत फाउंडेशन राष्ट्रसेवादल व्यक्तीमत्व विकास शिबीर आयोजनातून करत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा ख्यातनाम लेखिका संध्या नरे- पवार यांनी केले.
अद्वैत फाउंडेशन कणकवलीच्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित राष्ट्रसेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर उदघाटन प्रसंगी संध्या नरे-पवार बोलत होत्या. साने गुरुजींच्या प्रतिमेला संध्या नरे-पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोपुरी आश्रम चे कर्मचारी सदाशिव उर्फ बाबू राणे यांच्या हस्ते राष्ट्र सेवादल चा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी कणकवली कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ.चौगुले, राष्ट्रसेवादल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, गोपुरी आश्रम चे उपाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे,डॉ. सतीश पवार, अद्वैत फाउंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण , मातृमंदिर ओणी संस्थेचे भानू गोंडाळ,महेशकुमार आदींसह शिबिरार्थीं व पालक उपस्थित होते. शिबीरात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अहमदनगर, रत्नागिरी, कोल्हापूर येथील शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी पुढे बोलताना संध्या नरे-पवार म्हणाल्या की संविधानातील समतावादी मूल्यांच्या आधारे नवीन पिढी घडवण्यात राष्ट्रसेवादल शिबीर महत्वाची भूमिका निभावत असते. या शिबिरातून पुढे येणारी पिढी ही आदर्श समाजउभारणी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी समतावादी संविधानिक मूल्ये मानणारी , भेदभाव न मानणारी असते.
जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था, बाजारकेंद्री भांडवलशाही व्यवस्थेतून होणाऱ्या सामाजिक शोषणाला नकार देणारे विचार या शिबिरातून युवा आणि बाल पिढीच्या मनावर बिंबवले जातात. समाजात पसरत असलेल्या विद्वेषावर मात करून नवीन जीवनभान आणि समजभान जपण्याचा दृष्टिकोन राष्ट्र सेवादल शिबरातून मिळतो. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कणकवली कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.चौगुले म्हणाले, जातीव्यवस्थेच्या आणि वर्णव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन समतेचे संस्कार या शिबिरातून देण्याचे काम अद्वैत फाउंडेशन करत आहे.राष्ट्र सेवादल राष्ट्रीयसंघटक बाबासाहेब नदाफ, गोपुरी आश्रम चे उपाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे , डॉ सतीश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अद्वैत फाउंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया पाटिल यांनी केले. आभार राजन चव्हाण यांनी मानले.
