जिल्ह्यात चौथी कोरोनाची लाट नाही पालकमंत्री उदय सामंत
ओरोस ता.३०-:जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडी येथे पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. तर पुढील वर्षांपासून जिल्हा स्तरावर मोठ्या स्वरूपाचा ‘सिंधू महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय आज झालेल्या सभेत घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच जिल्ह्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नसल्याचे आरोग्य यंत्रणेचे मत असल्याचेही यावेळी सामंत यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत हे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बैठक सभागृहात कोविड, क्रीडा, नरडवे प्रकल्प, रमाई आवास योजना याबाबत आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत मंत्री सामंत यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सिंधू-रत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष आ दीपक केसरकर, आ वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, सतीश सावंत, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
