दुर्गंधीयुक्त आणि कचऱ्याचे साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी केली निवास व्यवस्था; सिंधुदुर्ग क्रीडा क्षेत्रातून नाराजीचे सूर
मालवण दि प्रतिनिधी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड पेण येथे आयोजित कबड्डी शिबिरासाठी गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुमार गटाच्या संघातील खेळाडूंची निवास व्यवस्था ही कचऱ्याचे साम्राज्य असलेली आणि दुर्गंधीयुक्त जागेत केल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होताच क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली निवड चाचणीसाठी गेलेल्या कबड्डीच्या खेळाडूंची निवास व्यवस्थेबाबत जि गैरसोय झाली त्याबद्दल नाराजीचा सूर उमटत असतानाच या खेळाडूंना अशा प्रकारची दर्जाहीन वागणूक देणाऱ्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ४८ वी कुमार / कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धा दिनांक ५ मे ते ८ मे या कालावधीत बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कुमार / कुमारी संघ निवड करण्यासाठी कुडाळ नेरूरपार येथे रविवार दि. २४ एप्रिल रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये कुमार गटाच्या संघासाठी रायगड पेण येथील गोवा गेट येथे कबड्डी शिबीर आयोजित करण्यात आले.
या कबड्डी शिबिरामध्ये ज्या खेळाडूंची निवड करण्यात आली त्या खेळाडूंना काल दि. २८ एप्रिल रोजी स्वखर्चाने निवड चाचणी ठिकाणी जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व कुमार गटातील खेळाडू त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्याठिकाणी त्यांची गैरसोय करण्यात झाली . या खेळाडूंना चक्क दोन खोल्यांमध्ये बारा जणांना ठेवण्यात आले शिवाय या खेळाडूंची ज्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आली त्याच ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य असल्याने खेळाडूंना गैरसोयीला तोंड द्यावे लागले याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. यामुळे मुलांचे होणाऱ्या हालाबाबत पालकांना देखील आता आपल्या पाल्याची काळजी वाटू लागली आहे.
या सर्व घटनेला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. खेळाडूंना त्याठिकाणी जेवण व नाष्टा उत्तम रित्या देण्यात आला. परंतु, या खेळाडूंना प्रसन्न राहण्यासाठी त्यांच्या अंगात अजून बळ येण्यासाठी ते वातावरण पोषक नसल्याचे समजते. सकाळी कबड्डी शिबिरामध्ये उत्तम खेळ करवून घेतला जातो परंतु रात्री आजूबाजूला असणाऱ्या कचऱ्यामुळे व तेथील दुर्गंधीमुळे या खेळाडूंना झोप लागत नाही याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.
