९.४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी; भाजप प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांची माहिती
कणकवली ता.१२-:* घरोघरी नळाद्वारे पाणी पोहचविण्याच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनेद्वारे देशातील ९.४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस मा आमदार प्रमोद जठार यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेसाठी चालूवर्षीच्या अर्थसंकल्पात ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रमोद जठार यांनी सांगितले की, मोदी सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाने पाणी पुरवण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागातील जनतेला विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीतून मुक्त करणे या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली. ९ एप्रिल २२ पर्यंत ९.४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवले जात आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत नळाद्वारे पाणी पूरविल्याजाणाऱ्या घरांची संख्या ३.२३ कोटी इतकी होती. तीन वर्षात ६.१५ कोटी घरांना नळाद्वारे पाणी पुरविण्यात आले. देशातील १०६ जिल्ह्यांमध्ये आणि १. ४५ लाख गावांमध्ये प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याच्या योजनेची वेगाने अंमलबजावणी होत आहे. देशातील दीड लाख गावांतील घरांमध्ये जल जीवन अभियानाची १००टक्के अंमलबजावणी झाली आहे.
मोदी सरकारने आता शहरी भागातही ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत १७ लाख ३९ हजार शाळा आणि अंगणवाड्यांमध्येही नळाद्वारे पाणी पुरविले जात आहे. या अभियानासाठी ५ वर्षात ३. ६० लाख कोटी एवढी तरतूद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी मैलो न मेल पायपीट करावी लागते. दुर्गम आणि पहाडी भागातील जनतेलाही पाण्यासाठी वणवण करावी लागते. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे पाणी आणण्यासाठीच कष्ट वाचले आहेत. ग्रामीण भागात एकूण घरांची संख्या १९.३१ कोटी एवढी आहे. घरोघरी नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असेही जठार यांनी नमूद केले.
