त्वरित नुकसान भरपाई न मिळाल्यास ‘आत्मदहन’

अभय देसाई यांचा इशारा;ज़िल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

*⚡सावंतवाडी ता.१४-:* कळणे बंधारा दुर्घटनेला जवळपास सहा महिने उलटूनही बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. ह्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरवठा करूनही न्याय मिळालेला नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा ज़िल्हा खनिकर्म शाखेच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा अभय पांडुरंग देसाई यांनी ज़िल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, २९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजता कळणे येतील शासन प्रस्थापित मायनिंग प्रकल्पाची तटरक्षक मानव निर्मित भिंत/बंधारा कोसळून साठवण केलेली खनिज माती व प्रचंड पाण्याचा साठा लोंढा कळणे धवडकीवाडीवरील वस्ती व शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रामध्ये घुसून घरांचे, भातशेती, फळबाग लागवड, विहिरी, शेततळी, ग्रामीण पाणी पुरवठा, नळयोजना, नदीपात्र यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेंच साग, फणस व जंगली झाडे हि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. त्याचसोबत शेत-बागायती, सुपीक जमीन ओसाड व पडीक झालेल्या आहेत.

कळणे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन रस्त्यावर आलेला आहे. तरी आपले प्रशासन जागे होत नाही. शासनाने रीतसर पंचनामे केलेलं असून आम्हाला ते मान्य आहेत. असे असूनही अद्याप शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्या संदर्भात काही मागण्यांसाठी आम्ही १५ ऑगस्ट २०२१ रोजी कळणे येथे उपोषण जाहीर केले होते. यावेळी तहसीलदार दोडामार्ग यांनी सर्व उपोषणकर्त्यांसमोर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासन व संबंधित कार्यालयाशी चर्चा करून १५ दिवसात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय घेऊन मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते.

त्यानंतर १३ ऑक्टोबर २०२१ रोजी गुरे ढोरे आणि सर्व संसार घेऊन प्रांत कार्यालय समोर आंदोलन केले होते. तेव्हाही ३० ऑक्टोबरपर्यंत नुकसानभरपाई भेटेल, असे फक्त गाजर दिले गेले. परंतु कळणे बंधारा दुर्घटनेला जवळपास ६ महिनेच काळ उलटून गेला असू अजूनही नुकसानग्रस्त शेतकरी न्याय मिळण्यासाठी ताटकळत आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसून ह्या संधर्भात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भेट देऊन पाठपुरवठा केला होता. परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही. दिलेल्या शब्दानुसार माझ्या आणि शेतकरी वर्गाच्या भावना लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा पांडुरंग देसाई आपल्या खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये ” आत्मदहन” करणार आहे.

आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे माझ्यावर “आत्मदहन” करण्याची वेळ आलेली आहे. तरी हा इशारा गांभीर्याने घ्यावा कारण माझ्याजवळ अजून काहीही पर्याय राहिलेला नाही आणि याचे जे काही परिणाम होतील त्या सर्वाना आपण आणि प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page